नागरिकांनी उपलब्ध करून दिलेल्या या छायाचित्रांमध्ये स्मशानभूमी परिसरात संशयास्पद पद्धतीने पूजा साहित्य मांडलेले दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी राखेच्या ढिगाऱ्याजवळ विचित्र चिन्हे व साहित्य ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट दिसत असल्याने येथे अघोरी प्रकार घडत असल्याच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्ती स्मशानभूमीत येत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे स्मशानातील राख चोरी करून अघोरी विधी केले जात असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकाराची संबंधित प्रशासन आणि पोलीस विभागाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसेच स्मशानभूमी परिसरात सुरक्षा व गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काय घडलं नेमकं ?
कळंबोली गावातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर राहिलेली राख चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी घडत असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अघोरी कृत्यांचा संशयही व्यक्त केला जात होता. काही दिवसांपासून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर ठेवण्यात आलेली राख दुसऱ्या दिवशी अचानक गायब होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कोण करत आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला. स्थानिकांच्या मते, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्ती स्मशानभूमीत येऊन ही राख घेऊन जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती याबाबतच नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.
या प्रकारामुळे नागरिकांकडून अघोरी कृत्यांसाठी ही राख चोरी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र स्थळी घडणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. स्मशानभूमी परिसरात कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अशा प्रकारांना वाव मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. रात्रीच्या वेळी कोणीही सहजपणे येथे प्रवेश करू शकत असल्याने हा प्रकार घडत असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.






