अजित पवारांना अंधारात ठेवून राष्ट्रवादीने लढवली बिहारची निवडणूक
Ajit Pawar NCP: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयू यांच्या नेतृत्वात एनडीएने दमदार कामगिरी केली आहे. परंतु महाराष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही बिहारची निवडणूक स्वबळावर लढवली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उभ्या केलेल्या या उमेदवारांना अत्यंत नगण्य मतदान झाले. सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले, पक्षावर ओढवलेल्या या नामुष्कीबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारता बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करू नका, असे मी सांगितले होते. तरीही वरिष्ठ पातळीवर प्रफुल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी तिथे जास्त लक्ष दिले नव्हते, मी महाराष्ट्रात होतो. त्यामुळे मला त्याबाबत अधिकची माहिती नाही, असे सांगता पक्षाच्या नेत्यांनी अजित पवारांना अंधाराता ठेवल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. परंतु, यातील एकाही उमेदवाराला दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही. सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले, राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना ५०० मतेही मिळाली नाहीत.
सासाराम विधानसभा मतदारसंघात आशुतोष सिंह यांना केवळ ११२ मते पडली. जिथे नोटालाही ३७० हुन अधिक मते पडली आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवाराला मतदारसंघातील एखाद्या एकूण मतांच्या १६ टक्के मते पडली नाहीत तर त्याचे डिपॉझिट जप्त होते.
अजित पवार गेल्या काही दिवसांपासून अडचणीतून जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत शरद पवार गटासोबत आघाडी करण्याची चर्चा सुरू होताच पार्थ पवार यांचे जमीन घोटाळा प्रकरण चव्हाट्यावर आले. त्याआधी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाची अडचण झाली होती.






