परळमधील भोईवाडा परिसरात वसलेल्या १५० वर्षे जुन्या भोईवाडा श्री राम मंदिरात यंदाचा रामनवमी उत्सव पारंपरिक भक्तिरसात न्हाऊन निघाला. “राम जन्मला गं सखे…” या जल्लोषात येथे जपली जाणारी एक अनोखी परंपरा पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पालखी हातात घेऊन नाचवण्याची. शहरात कदाचित एकमेव ठिकाणी जपली गेलेली ही परंपरा कोकणातील परंपरेशी जोडणारा जिवंत दुवा ठरते.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक शैलीत उभारलेले बांधकाम आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली सांस्कृतिक परंपरा. मंदिराचे विश्वस्त विरेंद्र केशरीनाथ ठाकूर आणि त्यांच्या पत्नी विनिता ठाकूर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही रामजन्म सोहळ्याचे आयोजन केले. सकाळपासूनच भक्तीभावाने वातावरण भारून गेले होते. पहाटे कलावती आई यांच्या भजनांनी उत्सवाची सुरुवात झाली, तर दुपारी आंब्रे गुरुजींच्या कीर्तनाने भक्तीचा रंग अधिकच गडद झाला. दुपारी रामजन्माचा सोहळा पार पडताच “राम जन्मला गं सखे…”च्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला. याच वेळी साईबाबांची पालखी मंदिरात दाखल झाली आणि भक्तीमय वातावरणात रंग भरला.
संध्याकाळी सहा वाजता रामाची पालखी निघाली आणि भोईवाडा गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पालखी हातात घेऊन नाचवण्याची परंपरा विशेष आकर्षण ठरली. ढोल-ताशांच्या तालावर, अभंगांच्या सुरावटीत आणि “जय श्रीराम”च्या घोषात भक्तांनी पालखी नाचवत गाव प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा मंदिरात परतले. काही घरांच्या अंगणात पालखी थांबून त्या घरातील देव पालखीच्या भेटीला येत असतात. यंदाच्या उत्सवात सामाजिक स्पर्शही जाणवला. लहान मुलांसाठी रामाच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला, तर डॉक्टर अजित पवार आणि त्यांच्या वडिलांनी भजन सादर करून उत्सवात सहभाग घेतला. शहरीकरणाच्या वेगात हरवत चाललेल्या परंपरांच्या पार्श्वभूमीवर भोईवाडा येथील हे राम मंदिर आजही संस्कृतीची ओळख जपणारे केंद्र ठरते. पालखी नाचवण्याची परंपरा केवळ धार्मिक विधी नसून, ती समुदायाच्या एकात्मतेची आणि सांस्कृतिक सातत्याची जिवंत अभिव्यक्ती आहे.
पवईतील आय. आय. टी. मेन गेट जवळील साईनाथ नगर ‘साई मित्र मंडळ’ यंदा आपल्या उत्सवाचे ४५ वे वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामनवमीच्या औचित्यावर ‘श्री साईसच्चरित अखंड पारायण’ आणि ‘साई भंडारा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी श्री साईसच्चरित चक्रीय अखंड पारायण प्रारंभ झाले असून सायंकाळी साई भजन आणि रात्री साई प्रसाद तसेच गुरुवारी सकाळी ०८:०० वा: अखंड पारायण समाप्ती करून दुपारी १२:०० वा: श्री राम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री ‘साई भंडारा’ (महाप्रसाद) आयोजित करण्यात आले असल्याचे साई मित्र मंडळाचे अश्विन चव्हाण यांनी सांगितले. गेल्या ४५ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी झाल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.






