मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो, असं मत व्यक्त केलं. तसेच शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांचा उल्लेख करत त्यांच्याकडून देशाला खूप प्रेरणा मिळाल्याचंही केसीआर यांनी नमूद केलं.
“मी तेलंगणाची जनता आणि माझ्यावतीने उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्यासाठी आमंत्रित करतो. आज महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळालं. हे प्रेम आम्ही सोबत घेऊन जातो आहोत. या प्रेमाचा परतावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असं केसीआर यांनी सांगितलं.
Telangana CM K Chandrashekar Rao meets Maharashtra CM Uddhav Thackeray and his cabinet ministers and leaders at Varsha bungalow – Maharashtra CM’s official residence in Mumbai.
Actor Prakash Raj was also present. pic.twitter.com/nYHrkpofJ9
— ANI (@ANI) February 20, 2022
उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला. उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. तसेच परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचं एक मत असल्याचं देखील के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.
आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.