
पाणी वाचवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा! नवी मुंबईत पाण्याच्या अपव्ययावर लाख रुपयांपर्यंत दंड
याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुणे, व्यावसायिक कामे किंवा इतर अनावश्यक कारणांसाठी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. विशेषतः वाहन धुण्याच्या केंद्रांचे पाणी कनेक्शन तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेने दंडाचीही कडक तरतूद केली आहे. नियमांचे उल्लंघन प्रथमच आढळल्यास २५ हजार रुपये, दुसऱ्यांदा ५० हजार रुपये आणि तिसऱ्यांदा तब्बल १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. तसेच सातत्याने नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाईही करण्यात येणार आहे.
याशिवाय मोठ्या मॉल्स, हॉटेल्स, व्यावसायिक संकुले आणि इतर मोठ्या आस्थापनांच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार कपात करण्यात येणार आहे. बांधकाम प्रकल्पांसाठी शुद्ध केलेले (Treated) पाणी वापरणे बंधनकारक करण्यात येणार असून पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी करण्यास मनाई करण्यात येणार आहे.
अवैध पाणी जोडण्या आणि अनधिकृत पाणी वापर याविरोधातही विशेष तपास मोहीम राबविण्यात येणार आहे. पाणीगळती रोखणे, पुनर्वापराला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे यावरही महापालिकेचा भर राहणार आहे. शहरातील पाणीसाठा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करावा आणि जलसंवर्धनाच्या उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये यासाठी प्रशासन आणि नागरिक यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक जलसंवर्धन कृती आराखडा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून वाहन धुण्याच्या केंद्रांचे पाणी कनेक्शन तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पहिल्यांदा २५ हजार, दुसऱ्यांदा ५० हजार आणि तिसऱ्यांदा १ लाख रुपयांपर्यंत दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मोठ्या व्यावसायिक आस्थापनांच्या पाणीपुरवठ्यात कपात, बांधकाम प्रकल्पांसाठी प्रक्रिया केलेले पाणी बंधनकारक करणे आणि अवैध पाणी जोडण्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.
रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी