
नेरळ खांड्यात पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद
कर्जत : नेरळ गावच्या हद्दीवर असलेल्या ममदापूर ग्रामपंचायत मधील खांडा भागातील अचानक नगर मधील रहिवाशी पावसाळा सुरू होण्याआधीच घाबरले आहे.तेथे जमीन विकासक बिल्डरने आजुबाजूच्या लोकांचा कोणताही विचार न करता मातीचा भराव आपल्या जमिनीमध्ये केला आहे.त्याचा परिणाम तेथून पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला बंद होणार आहे.त्यामुळे पावसाचे पाणी तेथेच अडकून पडणार असून पावसाळ्यातील पहिल्याच दिवशी तेथील अनेकांच्या घरात पाणी शिरणार आहे. दरम्यान,अलायन्स ग्रुप या बांधकाम व्यावसायिक विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
कर्जत नेरळ कल्याण या राज्यमार्ग रस्त्याने येणारा नाला ममदापूर ग्रामपंचायत मधील खांडा भागातून जातो.येथील नैसर्गिक नाला ‘अलायन्स ग्रुप’ या कंपनीच्या बिल्डर कडून आपल्या जमिनीत केलेल्या मातीच्या भरावामुळे बंद झाला आहे.संबंधित बिल्डरने आपल्या जमिनीमध्ये गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी केलेल्या मातीचा भारताचा परिणाम त्या भागात राहणारे स्थानिक लोकांच्या दारातून जाणारा नाला बंद होणार आहे.हा नाला त्या बिल्डर कडून पूर्णपणे बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मनमानी कारभारामुळे आगामी पावसाळ्यात नेरल खांडा येथील अचानक नगरमधील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जीवितहानी होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येच्या विरोधात येथील स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
Karjat News : प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड
या संदर्भात अचानक नगर येथील तरहिवाशी यांनी एकत्र येत आवाज उठवला आहे. ग्रामस्थांनी कर्जत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी आणि नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडे पत्राद्वारे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.काही दिवसांवर आलेले पावसाळ्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अचानक नगर येथील रहिवासी यांनी आपल्या घरांच्या बाजूलाच ‘अलायन्स ग्रुप’ या कंपनीच्या बिल्डरने बिल्डिंगचे बांधकाम सुरू केले आहे. बांधकाम करत असताना बिल्डरने ममदापूर गावाकडून येणारा नैसर्गिक नाला पूर्णपणे बंद केला आहे. सद्यस्थितीत प्रत्यक्ष जागेवर मोठ्या प्रमाणावर दगड आणि मातीचे ढीग टाकून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे.
दरम्यान पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, नैसर्गिक गटांरातून वाहून जाणारे पाणी जाण्यासाठी बिल्डरने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. यामुळे पहिल्याच पावसात डोंगर आणि उंचावरून येणारे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरून घरांचे अतोनात नुकसान होऊ शकते, अशी तीव्र भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या बिल्डरच्या दादागिरीविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अचानक नगरमधील ग्रामस्थांनी पुढाकार घेत निवेदनातून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे मागणी केली आहे.प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हा नाला पूर्ववत केला नाही किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम पर्यायी व्यवस्था करून दिली नाही, तर नेरळ खांडा येथील अचानक नगरमधील सर्व नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व संबंधित बिल्डरवर असेल.