फोटो सौजन्य-टीम नवराष्ट्र
सोलापूर : राज्य शासन दरवर्षी पाच हजार बसेस याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या बार्शी आगाराला 10 नव्या बसेस मिळाल्या असून, अशाच उर्वरित 8 आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. सोलापूर बस स्थानकामधील प्रसाधनगृहाची पाहणी केली. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस, बसस्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदने सादर केली.
स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बसस्थानक सुधारणेबाबत व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली. लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली. याभेटी दरम्यान एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी व अन्य अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या 5 वर्षांत 25 हजार बसेस घेणार
परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले, “राज्य शासनाने दरवर्षी 5 हजार नवीन कोऱ्या एसटी बसेस महामंडळाला घेऊन देण्याचे निश्चित केले आहे. याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. जेणेकरून भविष्यात सर्व सामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित होईल”.
कल्याणकारी मंडळाची स्थापना
महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे, या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल, असे राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच सांगितले होते. ते या कल्याणकारी महामंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलत होते.