'मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते...',नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना होणारा विलंब आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खराब काम करणाऱ्या आणि प्रकल्पांना विनाकारण विलंब लावणाऱ्या ठेकेदारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर येत्या एका वर्षात सर्वाधिक ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा ‘रेकॉर्ड’ करण्याचा आपला निर्धार असल्याचेही गडकरींनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर बोलताना गडकरींनी नाराजी व्यक्त केली असून महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होण्यास झालेल्या प्रचंड विलंबामुळे आपल्याला लाज वाटत होती, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या महामार्गाच्या उद्घाटनासाठीही येणार नाही, असे आपण यापूर्वी जाहीर केले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली. आता मात्र परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय गडकरींनी घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबई विमानतळावरून रस्त्याने गोव्याला जाणार असून मुंबई-गोवा महामार्गाची स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये विलंब किंवा निकृष्ट काम करणाऱ्यांची आता गय केली जाणार नसल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. जबाबदार ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल. त्याचबरोबर निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
Nitin Gadkari ji– “I want to set a RECORD for blacklisting the maximum number of contractors and taking action against them in a year.” Officials will also face suspension🔥 pic.twitter.com/DPswjOSik2 — Sunny Raj (@SunnyRajBJP) September 10, 2026
गेल्या १५ हून अधिक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाविषयी आता नितीन गडकरी यांनाही लाज वाटू लागली आहे. याबाबत त्यांनीच कबुली दिली. ते म्हणाले की, ” येणाऱ्या काळात मुंबई गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते की इतका उशीर झाला आहे.”
एका वर्षात जास्तीत जास्त ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणे, त्यांच्यावर कारवाई करणे आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा रेकॉर्ड करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणि प्रकल्पांच्या वेळेत पूर्ततेबाबत केंद्र सरकार अधिक कठोर भूमिका घेण्याचे संकेत मिळत आहेत.
गडकरींनी गोवा सरकारला मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा प्रवाशांसाठी विशेष सुविधा विकसित करण्याची सूचनाही केली. या सुविधांमध्ये गोव्याची वास्तुकला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकला परंपरा यांचे दर्शन घडवता येईल, असे त्यांनी म्हटले. पेट्रोल आणि डिझेल पंपांबरोबरच जैवइंधन, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर पर्यायी इंधनांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
महामार्गांच्या बाजूला करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीबाबतही गडकरींनी महत्त्वाची भूमिका मांडली. कोणत्या प्रजातींची झाडे लावावीत, कोणती झाडे जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन देतात, याचा वैज्ञानिक अभ्यास करून वृक्षलागवडीचे नियोजन करावे, असे त्यांनी सुचवले.
गोव्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी व्यापक अभ्यासाची आवश्यकता असल्याचेही गडकरींनी सांगितले. बाजारपेठांचे एकत्रीकरण, शहरातील गोदामे बाहेर हलवणे आणि बस डेपोमध्ये सुधारणा करणे यांसारखे उपाय त्यांनी सुचवले. त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक, हायड्रोजन, फ्लेक्स-फ्युएल आणि अन्य पर्यायी इंधन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यायी इंधनाचा वापर वाढल्यास वाहतूक क्षेत्रातून होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल, असे गडकरींनी नमूद केले.






