पिपंरी-चिंचवडच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी महापौर रवी लांडगेंची जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट
चिखली परिसरासाठी सध्या इंद्रायणी नदीवरील निगोजे बंधाऱ्यातून दररोज ९० एमएलडी पाणी घेण्यात येते. हे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून परिसरातील नागरिकांना वितरित करण्यात येते. याशिवाय भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी २०० एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत महापौर रवि लांडगे यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. तसेच निगोजे येथील सध्याची पंपिंग व्यवस्था ही आंद्रा धरणातून थेट जलवाहिनी कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात येत आहे, याबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
यानंतर निगडी येथील सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली. यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी केंद्राबाबत सविस्तर आढावा घेतला. हे जलशुद्धीकरण केंद्र सुरुवातीला ११४ एमएलडी क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र शहराचा विस्तार, नवीन निवासी व औद्योगिक क्षेत्रांची वाढ आणि पाण्याच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता या केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे.
अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा! फोनची बॅटरी तोंडात टाकताच झाला भीषण स्फोट, तरुण जखमी; घटनेचा Video
सध्या हे केंद्र ५५० एमएलडी क्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून तसेच पंपिंग व्यवस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सुमारे ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, गुणवत्ता तपासणीचे निकष आणि वितरण व्यवस्थेची माहितीही यावेळी महापौर यांना देण्यात आली.
या पाहणीदरम्यान भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पाणी उचल, शुद्धीकरण व वितरणाची साखळी, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी प्रक्रिया तसेच शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची क्षमता व स्थिती याबाबत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी माहिती दिली.
यावेळी महापौर रवि लांडगे यांनी शहरातील नागरिकांना भविष्यातही नियमित, पुरेशा दाबाने आणि दर्जेदार पाणीपुरवठा होण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आणि त्यासाठी अधिकाधिक दर्जेदार उपाययोजना राबविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले.






