सौजन्य - नवराष्ट्र टीम
जळगाव : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता जळगावमधून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अखेर शहर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पीडित महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार, घोलप वारंवार तिच्याशी अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने महिला डॉक्टरकडे शारीरिक संबंधांची मागणी करत छळ केला. या प्रकारामुळे त्रस्त होऊन पीडितेने प्रथम महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आणि त्यानंतर थेट शहर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल केला. महिला डॉक्टरच्या केबिनमध्ये वारंवार येऊन घोलप अश्लील टिपण्या करत होता, असा गंभीर आरोप तिने तक्रारीत केला आहे. इतकेच नव्हे, तर एके दिवशी त्याने तिला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून थेट शरीरसुखाची मागणी केली, असे पीडितेने स्पष्टपणे नमूद केले आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर, पीडितेवर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या घरी तसेच तिच्या पतीच्या कार्यालयात काही व्यक्तींना पाठवून धमकावण्यात आले. इतकेच नव्हे, तर तक्रार निवारण समितीचे सदस्य असल्याचे भासवून एका महिलेने पीडितेवर तक्रार मागे घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र चौकशीत त्या महिलेचा समितीशी काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण प्रकरणातील गंभीरता लक्षात घेता, शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत डॉ. विजय घोलप याला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
पुजाऱ्यानेच केला तरुणीचा विनयभंग
मुंबईतल्या कांदिवली पश्चिम भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराच्यापुजाऱ्यानेच मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. एवढेच नाही तर तरुणीच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली तेव्हा आरोपी पुजाऱ्याने देवासमोरच दोर लावत फास घेतला आणि आत्महत्या केली आहे. राजेश स्वामी अस या आत्महत्या करणाऱ्या पुजाऱ्याचे नाव आहे. तो मुळचा मध्य प्रदेश ग्वालियरचा राहणार होता. गेल्या पाच वर्षापासून तो तारकेश्वर मंदिरात पूजा करत होता. त्याची नजर त्या मुलीवर गेली आणि त्याने घृणास्पद कृत्य केल. गुन्हा दाखल झाल्याची त्याला कुणकुण लागली आणि अटक होण्याच्या भीतीने आणि बदनामी होईल याची त्याला भीती वाटली. देवेसमोरच त्याने फास घेतला आणि स्वतःच जीवन संपवल.