
उन्हाळी सुट्टीत बालसाहित्यास नवी उभारी; वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रमांची मेजवानी
पुणे/पवळे गायत्री : उन्हाळ्याची सुट्टी ही मुलांच्या आवडी-निवडी जोपासण्याची आणि नवीन गोष्टी आत्मसात करण्याची उत्तम संधी असते. याच अनुषंगाने बालसाहित्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. मराठी बालसाहित्याची समृद्ध परंपरा लक्षात घेता कथा, कविता, चित्रकथा, साहसकथा, विज्ञानाधारित लेखन, तसेच लोककथांचा पुनर्प्रत्यय अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश यंदा करण्यात आला आहे. यामुळे मुलांच्या कल्पना शक्तीला चालना मिळण्याबरोबरच त्यांच्या भाषिक कौशल्यातही वाढ होणार आहे.
मुलांना वर्षभर आतुरता असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टया आता काही दिवसांतच सुरु होणार असून, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी साहित्याची समृद्ध मेजवानी सज्ज झाली असून वाचनसंस्कृती रुजवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. विविध संस्था, प्रकाशक आणि साहित्यिक यांच्या पुढाकारातून एप्रिल-मे महिन्यात शहरभर उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. कथाकथन, काव्यवाचन, पुस्तक प्रदर्शन, सर्जनशील लेखन कार्यशाळा, बालनाट्य आणि संवाद सत्रांच्या माध्यमातून मुलांना पुस्तकांच्या विश्वाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यंदाच्या साहित्य उपक्रमांमध्ये आधुनिकतेची जोडही विशेषत्वाने देण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित गोष्टी, डिजिटल पुस्तके, ऑडिओ स्टोरीज आणि इंटरअॅक्टिव्ह उपक्रम सत्रांमुळे मुलांना वाचनाचा नवा अनुभव मिळणार आहे. पारंपरिक पुस्तक वाचनासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना अधिक आकर्षक पद्धतीने साहित्याशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे वाचन हा केवळ अभ्यासाचा भाग न राहता आनंददायी अनुभव बनत आहे.
बालसाहित्य निर्मितीत नव्या लेखकांचा सहभागही यंदा वाढला असून, विविध प्रकाशन संस्था त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. यामुळे विषयवैविध्य, नवीन प्रयोग आणि समकालीन आशय बालसाहित्यात दिसून येत आहे. पर्यावरण, विज्ञान, मैत्री, कुटुंबव्यवस्था, सामाजिक मूल्ये अशा विविध विषयांवर आधारित साहित्य मुलांसमोर आणले जात आहे. यामुळे वाचन केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता मूल्यशिक्षणाचे माध्यम बनत आहे.
विविध उपक्रमांद्वारे लेखकांशी संवाद
विविध उपक्रमांदरम्यान मुलांना लेखकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या शंकांचे निरसन आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुस्तक वाचन स्पर्धा, कथा लेखन स्पर्धा, चित्रकला आणि गोष्टी सांगण्याच्या स्पर्धांमुळे मुलांचा सहभाग अधिक वाढणार आहे. पालकांनीही मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असून, घरात वाचनाचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उन्हाळ्याच्या सुट्टीत बालसाहित्याच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा व्यापक प्रयत्न होत असून या उपक्रमांमुळे वाचनसंस्कृती अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बालकांचा सुट्टीतील वेळ अधिक अर्थपूर्ण, समृद्ध आणि सर्जनशील बनवण्यात या साहित्य मेजवानीची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.
बालसाहित्यामध्ये खूप नवनवीन प्रयोग होत आहेत. ऑडिओ बुक्सचे प्रमाण वाढत आहे. ऐकणारी पुस्तके हा एक नवीन वेगळा ट्रेंड येत आहे. पूर्ण रंगीत पुस्तके असणार आहे. एआय मुळे चित्रकार संपत चालले आहेत असा एक आक्षेप घेतला जात होता पण तो खोटा ठरत आहेत. चित्रकारांचे महत्व सुद्धा सध्या वाढत आहे. संस्कारशील साहित्य म्हणजे हनुमान कथा, रामायण अशी माहिती सगळ्या मुलांपर्यंत नवीन माध्यमांद्वारे पोहचवण्याचा प्रयत्न आहे. – घनशान पाटील (चपराक प्रकाशक)
हे सुद्धा वाचा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तब्बल 38 हजार कोटींची एफआरपी खात्यात जमा