
MLA Sunil Shelke emotional on Maval Zilla Parishad and Panchayat Samiti election result
“अजितदादा असते तर आम्ही आज मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला असता. मात्र या कठीण परिस्थितीतही मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम साथ दिली, याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे,” असे आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समितीच्या १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; भाजपाचा सुपडा साफ
विकासकामांची आठवण काढत व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की. “अजित पवार यांनी मावळच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्या निधीतून अनेक महत्त्वाच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत मावळमध्ये जे काही परिवर्तन होत आहे, त्यामागे अजितदादांचे मोठे योगदान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
निकाल म्हणजे जनतेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न
पुढे आमदार शेळके म्हणाले की, “आजचा हा निकाल म्हणजे मावळच्या जनतेने अजित पवार यांच्या ऋणातून उतराई होण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे भावनिक विधान शेळके यांनी केले. या शब्दांतून जनतेचा विश्वास आणि अजित पवार यांच्यावरील निष्ठा स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.
हे देखील वाचा : Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती खालावली; बारामतीहून पुण्याच्या दिशेने रवाना
अजितदादांचा विषय निघताच डोळे पाणावले
तसेच भाषणादरम्यान अजित पवार यांचा विषय निघताच सुनील शेळके अचानक भावूक झाले. अजितदादांच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले आणि काही क्षण ते बोलू शकले नाहीत. उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही या क्षणी भावनिक वातावरण निर्माण झाले. शेळके यांनी थोडा वेळ घेत स्वतःला सावरले, मात्र पुढे फारसे बोलणे त्यांना शक्य झाले नाही.
कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण
या प्रसंगी अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही अश्रू दिसून आले. “हा विजय केवळ राजकीय नाही, तर भावनिक आहे,” अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या सर्व १५ जागांमागे नेतृत्व, विकास आणि जनतेचा विश्वास हेच मुख्य कारण असल्याचे चित्र या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले.