
राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार (Photo Credit- X)
मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, मराठी ही अत्यंत प्राचीन भाषा आहे, तर हिंदी अवघ्या १५०-२०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. हिंदीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अजून हजार वर्षे लागतील, अशा शब्दांत त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवर तोफ डागली. यावेळी त्यांनी बंगालमधील एक व्हिडिओ दाखवत, तिथले लोक स्वतःच्या भाषेसाठी किती कडवट आहेत याचे उदाहरण दिले. “तुम्ही जोपर्यंत आपल्या भाषेसाठी कडवट होत नाही, तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत,” असा सल्लाही त्यांनी मराठी भाषकांना दिला.
राज ठाकरे यांनी क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे विशेष कौतुक केले. “सचिन भारतरत्न असूनही आपली भाषा आणि राज्य विसरलेला नाही. वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रम असो वा जागतिक व्यासपीठ, सचिन पहिले भाषण मराठीतच करतो, याचा मला अभिमान वाटतो,” असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी विनाकारण हिंदीत भांडणाऱ्या आणि चुकीची भाषा वापरणाऱ्या मराठी माणसांनाही खडेबोल सुनावले.
MNS राज ठाकरेंचा महिला आरक्षण अन् मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा की विरोध? स्पष्ट केली भूमिका
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणे सक्तीचे आहे, मात्र काही संघटनांनी याला विरोध करत संपाचा इशारा दिला होता. यावर सरकारने माघार घेत १५ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे आणि मराठी शिकवण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. “इतर राज्यांत, जसे की तामिळनाडू किंवा गुजरातमध्ये असे घडते का? आपले मंत्री परप्रांतीयांना मराठी शिकायला वेळ का देतात?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या चालकांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली.
सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र सध्या जातीपातीच्या राजकारणात अडकला आहे. “आम्ही महापुरुषांना जातीत विभागले आहे. लेखक आणि कवींची जात पाहून पुस्तके विकत घेतली जातात, हे दुर्दैवी आहे. या वादातून आपण बाहेर पडले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.