सौजन्य - नवराष्ट्र टीम
जुन्नर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. येथील वयोवृद्ध मतदारांनी दाखवलेली निष्ठा वाखाणण्याजोगी होती. अनेक केंद्रांवर ८० ते ९० वयोगटातील वृद्ध नागरिक आपल्या नातवंडांच्या हाताला धरून किंवा लाकडी काठीचा आधार घेत मतदानासाठी पोहोचले होते. ”वयाची नव्वदी गाठली तरी मतदान करायला कधी चुकलो नाही. विकास करणारा माणूस निवडण्याचा हाच तो दिवस,” अशी भावना ओतूर येथील चैतन्य विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्यध्यापक मुरलीधर गहिनाजी भोर गुरुजी (वय वर्षे ९७ ) या ज्येष्ठ मतदाराने व्यक्त केली. शारीरिक व्याधी असूनही केवळ लोकशाहीवरील श्रद्धेपोटी या ज्येष्ठांनी केंद्रावर केलेली गर्दी ही नवमतदारांसाठी एक मोठा धडा ठरली.
व्यापारी आणि शेतीसाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या ओतूर शहरात आणि परिसरातील गावांमध्ये सकाळच्या पहिल्या चार तासांत विक्रमी मतदानाची नोंद झाली. सध्या शेतीकामांचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. १० वाजेपर्यंत बहुतांश केंद्रांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः महिला मतदारांचा सहभाग यावेळी लक्षणीय होता. महिलांनी आपले घरकाम लवकर उरकून लोकशाहीच्या या उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवला.
ज्यावेळी मतदार मोठ्या उत्साहाने केंद्रावर पोहोचत होते, त्याचवेळी अनेक ठिकाणी मतदार यादीतील त्रुटींनी गोंधळ उडवून दिला. अणे-माळशेज पट्ट्यातील काही गावांमधील जुन्या जाणत्या मतदारांची नावे अचानक यादीतून गायब झाल्याचे समोर आले. “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही याच केंद्रावर मतदान करतो, पण आज नाव शोधताना कर्माची फळं भोगावी लागत आहेत,” असा संतप्त सवाल काही नागरिकांनी उपस्थित केला. अनेक मतदारांनी आधार कार्ड आणि ओळखपत्र आणले असूनही, यादीत नाव नसल्याने त्यांना मतदानाविना माघारी फिरावे लागले. यामुळे प्रशासनावर आणि विशेषतः निवडणूक विभागाच्या नियोजनावर मतदारांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढले.
बोगस मतदानाचे गालबोट; नवयुवक मतदारांचा संताप
या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे ‘बोगस मतदानाची’. काही संवेदनशील केंद्रांवर धक्कादायक प्रकार समोर आले. अनेक नवयुवक मतदार, जे पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी उत्सुक होते, जेव्हा केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांचे मतदान आधीच झाल्याचे त्यांना मतदान अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हा प्रकार उघडकीस येताच केंद्राबाहेर मोठा गोंधळ झाला. “आम्ही लोकशाहीचा उत्सव साजरा करायला आलो होतो, मात्र आमच्या हक्काचे मत कुणीतरी आधीच देऊन गेले, हे लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी संतापजनक प्रतिक्रिया एका युवती मतदाराने दिली. काही गावांमध्ये यामुळे दोन गटांत शाब्दिक चकमकीही उडाल्या, ज्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
अनेक मतदारांची नावे यादीत नसल्याचे दिसून आले. या मतदारांना अनेक ठिकाणी मतदान यादीत नावाची पाहणी करण्यासाठी भटकावे लागले. शेवटी अनेक मतदारांना नाव नेमके कोणते मतदान केंद्रावर आहे याचा ठाव ठिकाणा लागू शकला नाही. मतदान कार्डवरील क्रमांकाच्या आधारे यादीत नाव शोधले तरी ते सापडले नाही. इतर दुसऱ्या मतदान केंद्रावर देखील पडताळणी केल्यानंतरही नाव सापडले नसल्याने अनेक मतदारांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. गेल्या पंधरा दिवसात जुन्नर तालुक्यातील गावा गावांमधील वातावरण आरोप- प्रत्यारोप आणि कुरघोडीच्या राजकारणाने तापले होते. त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये अल्पशा असा प्रतिसाद दिसून आला.
हे सुद्धा वाचा : मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद
एकूणच जुन्नर तालुक्यातील अणे-माळशेज पट्ट्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेले हे मतदान संमिश्र अनुभवांचे राहिले. वयोवृद्धांनी मतदानाचा हक्क बजावून एक सकारात्मक संदेश दिला असला, तरी बोगस मतदान आणि यादीतील घोळामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या गोंधळाचा आणि उत्साहाचा निकाल पेटीतून कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अनेक ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होणार याविषयी एक हजार ते पाच हजार रुपयांच्या पैंजा लागलेल्या आहेत. मतदान केंद्रावर कोणत्या ठिकाणी कशी मते पडणार याबाबत अफवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्या आहेत.
महाराष्ट्रामध्ये गेल्या चार वर्षांपासून चाललेल्या राजकारणाची पातळी घसरली आहे. कोणता पक्ष सत्तेत आणि कोणता पक्ष विरोधात हे कळेनासे झाले आहे. एकमेकांच्या विरोधात उभे राहून प्रचार करायचा आणि स्वार्थासाठी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायच हे मतदारांना संभ्रमात टाकण्यासारखा आहे. कुणालाही मतदान दिले तर पुन्हा एकत्र येणार आणि आमच्या मतदानाची किंमत शून्य ठरविणार त्यामुळे आम्हाला आता मतदान करण्याचा उत्साह राहिला नाही. – भास्कर शंकर मुंढे (जेष्ठ मतदार, ओतूर)






