
Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली 'ही' मागणी
राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे नाव देण्यात आलेल्या कर्जत मुरबाड मार्गवरील कळंब गावाजवळील रस्ता अद्याप काँक्रीटचा बनवला नाही. कळंबजवळील या वळणाचा भाग अद्याप काँक्रीट करण्यात आलेला नाही. रस्ता सरळ करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने वळणाचा हा भाग अपूर्ण राहिला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडत असल्याचे चित्र आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत असलेल्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची तात्पुरती कार्यवाही केली जाते. त्यात पाऊस आणि अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे काही दिवसांतच हे खड्डे पुन्हा उखडतात.
दरवर्षी खड्डे बुजविण्याऐवजी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे, कळंबजवळील अपूर्ण राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण तातडीने पूर्ण करावे, रस्ता सरळ करण्यासाठी रखडलेले पुलाचे काम पूर्ण करावे तसेच पूर्ण झालेला नाल्यावरील पूल तातडीने वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी आहे.
पावसाळा आला की खड्डे पडतात, खड्डे बुजवतात, पाऊस थांबल्यावर पुन्हा खड्डे दिसतात. दरवर्षी अशी परिस्थिती ही गंभीर आहे. खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा रखडलेले पुलाचे काम पूर्ण करून रस्ता कायमस्वरूपी काँक्रीट करणे गरजेचे आहे. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची प्रशासनाने वाट पाहू नये. -मूहिब लोगडे, सामाजिक कार्यकर्ते