नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला
नवराष्ट्रने उपस्थित केलेल्या सुरक्षेच्या मुद्द्यानंतर चिपळूण उड्डाणपुलाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उड्डाणपुलाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पुलाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय तो वाहतुकीसाठी सुरू केला जाणार नसल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपुलाची एक लेन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. परंतु पुलाचे काम अपूर्ण असताना वाहतूक सुरू केल्यास वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे नवराष्ट्रने लक्ष वेधले होते.
आता सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे अपूर्ण अवस्थेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुलाचे उर्वरित काम पूर्ण करून आवश्यक सुरक्षेची खात्री झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपुलाची एक लेन सुरू होण्याच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला असून, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतरच पूल खुला करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
दरम्यान, सांस्कृतीक कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेकांकडून डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यामध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीमध्ये ते बोलत होते.






