"महायुती व जनतेच्या भक्कम पाठिंब्यावर विजय संपादन करू"; शेखर निकम यांचं वक्तव्य
चिपळूण/ संतोष सावर्डेकर :– विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी चिपळूण-संगमेश्वरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाला मिळाली आहे. म्हणूनच महायुतीतर्फे आमदार शेखर निकम यांच्या नावाची घोषणा झाली असून सोमवार दिनांक २८ रोजी निकम आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अशी माहिती निकम यांनी चिपळूणमध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या पाच वर्षात लोकांची केलेली कामं, संपर्क, विकासकामे तसंच महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनतेची भक्कम पाठींबा या सगळ्यांच्या जोरावर या निवडणुकीत आपण नक्कीच विजय संपादन करू, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस , प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी सरपंच आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, महायुतीतर्फे सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी १०.३० वाजता महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता या सर्वांच्या उपस्थितीत आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), भाजप, रिपाई (आठवले गट) तालुकाध्यक्ष, महिला आघाडी तालुकाध्यक्षा, सर्व सेल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सोमवार (ता. 28) सकाळी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चिपळूण परिषदेसमोरील व वेस मारुती मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले जाईल. यानंतर प्रांत कार्यालयापर्यंत रॅलीने जाऊन महायुतीचे नेते पदाधिकारी यांच्या समवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, अशी माहिती शेखर निकम यांनी यावेळी दिली.
शेखर निकम पुढे म्हणाले की, आपला उमेदवारी अर्ज भरण्यास प्रत्येक जण उत्सुक आहे. उत्स्फूर्तपणे लोकं येतील असा आपल्याला विश्वास आहे. सन 2014 च्या निवडणुकीत काही मतांच्या फरकाने पराभव झाला. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय झाला. या मतदारसंघात आतापर्यंत कोणाला मताधिक्य मिळाले नव्हते, तेवढे मताधिक्य मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मिळाले, असं निकम यांनी सांगितलं. मागील पाच वर्षाच्या कारकिर्दीत आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जनसंपर्क, लोकांची केलेली कामे, महापूर काळात केलेली कामे या सगळ्यांच्या जोरावर या निवडणुकीत आपण नक्कीच विजय संपादन करू, असा विश्वास आमदार निकम यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-Assembly Election 2024: राहुरीत तनपुरेंना धक्का; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ
शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण नाराज असल्याबाबत निकम यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी निकम म्हणाले की, सदानंद चव्हाण या निवडणुकीत ताकदीने उतरतील. तसेच शिवसेना शिंदे गट पदाधिकारी व कार्यकर्ते याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते रिपब्लीक आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वचजण ताकतीने निवडणूक प्रचार करतील, असा विश्वास आमदार निकम यांनी यावेळी व्यक्त केला. सन २०१९ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय मतदारांनी सहकार्य केले होते. त्याचप्रमाणे या निवडणुकीत देखील आपल्याला सर्व सहकार्य होईल, असा दावा निकम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. कोणाचे जे समज- गैरसमज असतील ते दूर करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा देताना ते म्हणाले की, रस्ते, जोड रस्ते, पूल, ग्रॅव्हिटी नळ पाणी योजना, धरण, बंधारे, मैदान विकसित करणे यांसारखी अनेक विकास कामे आपण या मतदारसंघात करून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील कालखंडात देखील या विकासात आणखी भर पडेल, अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी यावेळी दिली.