Kupwad Double Murder Case: कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक
कर्नाटकातील हेब्बाळ येथील केसरेकर कुटुंब कुपवाडमध्ये वास्तव्यास होते. मोहन केसरेकर हे बांधकाम क्षेत्रात मजुरीचे काम करून नुकतेच कष्टाने बांधलेल्या घरात राहण्यास आले होते. शेजारी राहणाऱ्या आरोपीकडून या कुटुंबाला सातत्याने त्रास व शिवीगाळ केली जात होती, असा आरोप पडळकर यांनी केला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या सुमारास आरोपीने मनीषा केसरेकर यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. मुलगा व मुलगी घराला कडी लावल्याने बचावले. गंभीर जखमी मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
आरोपीला तातडीने शोधून अटक केल्याबद्दल पडळकर यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. सरकारी वकील म्हणून हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करावी, तसेच दोन्ही मुलांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मुलांचे आजी-आजोबा वृद्ध असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे शासनाने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय नोकरी देण्याचा विचार करावा, असेही पडळकर म्हणाले.
या घटनेच्या निषेधार्थ २१ ऑगस्ट रोजी सांगली-कुपवाड शहर बंद ठेवून शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार संग्राम जगताप व महेश लांडगे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पडळकर यांनी केले.
ईश्वरपूर, सवळजसह विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचार, धार्मिक तेढ व बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारींबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. गुंठेवारीमुळे निर्माण होणाऱ्या वादांबाबत पालकमंत्री बैठक घेणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.
नितीन चौगुले यांनी सर्वसामान्य हिंदूंनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच अनधिकृत बांधकामांना परवानग्या व वीज जोडणी कशी मिळाली, याची चौकशी करण्याची मागणी केली. अशा घटनांबाबत मुस्लिम समाजातील जबाबदार घटकांनीही भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
Gas Cylinder: स्वयंपाकघरातील टेन्शन आता खल्लास! नव्या सरकारी योजनेतून घरात पोहचणार गॅस, होणार स्वस्त
धार्मिक आरक्षणाचा लाभ घेत असताना धार्मिक परिवर्तन करून वेगळा धर्म पाळणाऱ्यांबाबत शासनाने कायदेशीर चौकशी करावी. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात हिंदूंनी जागृत होण्याची गरज आहे, असे पडळकर म्हणाले. त्यांनी काश्मीरमधील लोकसंख्येतील बदलाचा संदर्भ देत धार्मिक लोकसंख्येतील बदल गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली.
सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. गरज भासल्यास अशा गुन्हेगारांवर एन्काऊंटरसारखी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांना कठोर कारवाईचे प्रशिक्षण देण्यासाठी उत्तर प्रदेशात पाठवावे आणि सांगलीतही गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका घ्यावी, असे पडळकर म्हणाले.






