उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार
कृष्णानगर येथील रहिवासी विजय कृष्णा गाडवे यांनी ही तक्रार पोलिसांकडे दिली आहे. २६ ऑगस्ट रोजी रात्री फेसबुकवर खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी संबंधित एक रिल पाहताना त्याखालील कमेंट सेक्शनमध्ये काही फेसबुक युजर्सनी कथितरित्या अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीमध्ये आशीर्वाद चव्हाण, बाळासाहेब नलघे, प्रदीप जगताप, अतुल अजमाने, शांताराम कांबळे, विजय सागर तसेच उल्हास चाळके अथवा तत्सम नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटधारकांचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित कमेंट्सची सत्यता, अकाउंटधारकांची ओळख आणि पोस्टमागील उद्देश यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांची सामाजिक व सार्वजनिक प्रतिष्ठा कमी करण्याच्या उद्देशाने या कमेंट्स करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच अशा प्रकारच्या मजकुरामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असले तरी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली आक्षेपार्ह, बदनामीकारक किंवा समाजातील शांतता भंग करणारा मजकूर प्रसारित करण्यास कायद्याची चौकट आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
संबंधित फेसबुक अकाउंटधारकांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्या पोस्ट व कमेंट्सची डिजिटल तपासणी करावी, तसेच चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विजय गाडवे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून तक्रारीची नोंद, उपलब्ध पुरावे आणि सोशल मीडिया पोस्टची सत्यता तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.






