मोठी बातमी! देवदर्शनावरून परतताना भीषण दुर्घटना; सोलापुरात पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू
सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील काही भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते आपल्या गावाकडे परतत असताना तांदूळवाडी गावाजवळ त्यांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. तसेच विहिरीभोवती कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने वाहन थेट पाण्यात कोसळले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात! वराडाच्या टेम्पोवर कंटेनर पलटला, १२ जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. विशेषतः चार महिला आणि चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहितीही समोर येत आहे.
या दुर्घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.






