( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Solapur News: अकलूज : महाराष्ट्र शासनाने गुटखा, मावा आणि सुगंधी तंबाखूच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही अकलूजसह माळशिरस तालुक्यात या पदार्थांची सर्रास विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालये तसेच चौका-चौकातील पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमधून हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शासनाच्या नियमानुसार शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र अकलूज, माळशिरस, वेळापूर, पिलीव, संग्रामनगर, नऊचारी आणि नातेपुते परिसरातील अनेक शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळच गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अनेक ठिकाणी हे पदार्थ पिशव्यांमध्ये, डब्यांमध्ये किंवा इतर वस्तूंआड लपवून विकले जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी, सुटल्यानंतर आणि महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत अशा दुकानांवर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
‘व्यसनमुक्ती शपथ अभियानाचा शुभारंभ; Mangal Prabhat Lodha म्हणाले, ‘… ही काळाची गरज आहे’
गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, दातांचे विकार तसेच इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. तरीही अनेक विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नागरिकांच्या मते, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नाही. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक मोहीम राबवून अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. छापे, दंड आणि जप्तीच्या कारवाया केवळ कागदोपत्री राहिल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाला, गुटखा यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ५ लाख रुपयांपर्यंत दंड आणि ६ महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त कारवाई करून गुटखा विक्रेत्यांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा पुढील पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकण्याचा धोका अधिक वाढेल.






