'तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका'; फडणवीस-शिंदे-बावनकुळे-विखेंवर जरांगेंचा हल्लाबोल
याप्रकरणी प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, “सरकार जाणीवपूर्वक मला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे नियोजनबद्ध कट असल्याचे चित्र दिसत आहे. मराठा समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे.
मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींच्या कुणबी प्रमाणपत्रांबाबत जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर मराठा समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला मिळालेल्या कुणबी नोंदी आणि त्यासंदर्भातील प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यावेळी मनोज जरांगे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. आक्रमक भाषण करताना त्यांनी इशारा दिला की, “तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका.” या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
जरांगे यांनी सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, कुणबी प्रमाणपत्रांबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी आणि समाजात संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, यावर सरकारची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या रक्ताची नोंद सापडली आहे. मग आता सरकारला त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. ओबीसींचे प्रमाणपत्र रद्द केले जात नाहीत. मराठा समाजावर अन्याय का केला जातोय, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने जाणीवपूर्वक मराठ्यांवर अन्याय केला आहे. हे आता मराठ्यांना समजलंय, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला.






