जिल्ह्यामध्ये "सोमेश्वर " ने फोडली पहिल्या हप्त्याची कोंडी
बारामती/सोमेश्वरनगर : चालू गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसासाठी प्रथम हफ्ता ३३०० रुपये प्रति मे.टनप्रमाणे देण्याचे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जाहीर केले. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. पुणे जिल्ह्यात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिलची कोंडी फोडली आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू असून, सध्या १०,००० मे. टन प्रतिदिन क्षमतेने गाळप होत आहे. आजअखेर एकूण २,०४,२५५ मे. टन गाळप झाले असून, जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १,९८,१०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९,२०,००० लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे तर सहविजनिर्मिती प्रकल्पामधून १,१५,५४,९२० युनिट्सची महावितरण कंपनीस विक्री केलेली आहे.
हेदेखील वाचा : Nanded News : कर्मचाऱ्यांनी समन्वय साधन काम करावे; उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांचे निर्देश
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची विकासाची घौडदौड चालू असून, गाळप हंगाम २०२५-२६ हा देखील विक्रमी व यशस्वीरित्या पार पडेल, अशा प्रकारचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे. या हंगामामध्ये साधारणपणे १४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट्य ठेवलेले असून, ऊस पुरवठा सातत्याने होण्याच्या दृष्टीकोनातून पुरेशी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली आहे.
3300 रुपये देण्याचे निश्चित
शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) रु.३,२८५ प्रति मे.टन इतका निघत असून, संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी रु.३,३०० प्र.मे.टन देण्याचे निश्चित केलेले आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये २ दिवसांमध्ये वर्ग करत असल्याचे कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम रामराजे जगताप यांनी सांगितले.
सोमेश्वर कारखान्याकडून नेहमी उच्चांकी दर
सोमेश्वर कारखाना नेहमीच उच्चांकी दर देत असून, या हंगामातही उच्चांकी ऊस दराची परंपरा सोमेश्वर राखणार असल्याचा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या गाळप क्षमतेस अनुसरुन पुरेसा ऊस उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून, ऊस तोडणीचे पूर्णपणे नियोजन केलेले असल्याचे जगताप यांनी नमुद केले. त्यामुळे कार्यक्षत्रातील शेतकऱ्यांनी सर्व ऊस सोमेश्वर कारखान्यास गळीतासाठी द्यावा, तसेच गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा, कंत्राटदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.






