उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा (Photo Credit- X)
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता आणि मुंबई येथे होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी ‘एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल’मधील अनुभवी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ भिडणार आहेत. तर, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा महामुकाबला रंगणार आहे.
कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यात रिचर्ड इलिंगवर्थ आणि एलेक्स व्हार्फ हे ‘ऑन-फिल्ड’ अंपायर म्हणून काम पाहतील. इलिंगवर्थ यांना मोठ्या आयसीसी स्पर्धांमधील अंपायरिंगचा दांडगा अनुभव आहे. भारतीय पंच नितीन मेनन यांच्याकडे या सामन्यात ‘थर्ड अंपायर’ची जबाबदारी असेल.
The #T20WorldCup semi-finals match officials have been confirmed.@emirates | Details 👇https://t.co/OpwxAjyGTJ — ICC (@ICC) March 3, 2026
मुंबईत होणाऱ्या भारत-इंग्लंड या हाय-व्होल्टेज सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या महत्त्वाच्या लढतीत न्यूझीलंडचे क्रिस गॅफनी आणि दक्षिण आफ्रिकेचे अल्लाउद्दीन पलेकर मैदानी पंच म्हणून कार्यरत असतील. पलेकर यांनी चालू स्पर्धेत भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या सामन्यांत यापूर्वी प्रभावी कामगिरी केली आहे.
टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर पंचांचा निर्णय सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. बाद फेरीच्या सामन्यात होणारी एक लहान चूकही एखाद्या संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंग करू शकते. हे लक्षात घेऊन आयसीसीने केवळ अनुभवी आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांचीच निवड केली आहे. या निर्णयामुळे सामने निष्पक्ष आणि सुरळीत पार पडण्यास मदत होईल. आता क्रिकेट चाहत्यांचे डोळे कोलकाता आणि मुंबईतील या सामन्यांकडे लागले असून, त्यानंतरच फायनलमध्ये पोहोचणारे दोन संघ निश्चित होतील.
T20 World Cup 2026 मधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिज संघही भारतात अडकला, बोर्डाने जारी केले निवेदन






