मोठी बातमी ! येत्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका
महापालिका निवडणुकासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. येत्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही निवडणूक तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका तर अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान प्रभाग रचना, इतर मागासवर्गांचे आरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसेच महापालिकांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती आदींच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आली. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६च्या आत घेण्याचा घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस आधी पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम) तुटवडा भासू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मशिन पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार केला आहे. याशिवाय ‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून ५० हजार ईव्हीएम खरेदी केली आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाकडेही ‘ईव्हीएम’ची मागणी करण्यात आल्याचे समजते. तिन्ही टप्प्यांत पार पडणाऱ्या या निवडणुकांतील मतांची मोजणी एकत्रित होणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशी होईल. निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर मतमोजणी होईल, असेही खात्रीलायकरित्या समजते.






