
Pune Politics, NCP Ajit Pawar, Parth Pawar, Sunil Tingre,
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापूर्वी पुण्यातील जिजाई बंगल्यावर पार्थ पवार, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पार्थ पवार यांनी टिंगरे यांना भविष्यात योग्य न्याय आणि सन्मान दिला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरे म्हणाले, “पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. पक्ष मला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. राजकारणात काही वेळा पक्षहितासाठी निर्णय घ्यावे लागतात. मी अजितदादांचा कार्यकर्ता असून पक्षाचा शब्द पाळणार आहे. भविष्यात माझा योग्य सन्मान राखला जाईल, असे पक्ष नेतृत्वाने आश्वासन दिले आहे.”
दरम्यान, विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. विक्रम काकडे हे उद्योजक आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असून माजी आमदार अनिल भोसले यांचे जावई आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील काही इच्छुक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण आता राष्ट्रवादीतील या पेचावर तोडगा निघाला आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी ‘आयात उमेदवार’ असल्याचा मुद्दा उपस्थित करत काकडे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर पक्षाने सुनील टिंगरे यांनाही अर्ज दाखल करण्यास सांगितले होते.
विशेष म्हणजे, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांकडेही पक्षाचा ‘एबी फॉर्म’ असल्याने राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नेमका कोण, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, पार्थ पवार यांच्या मध्यस्थीनंतर टिंगरे यांची समजूत काढण्यात यश आले. अखेर त्यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारीचा वाद संपुष्टात आला असून विक्रम काकडे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत उमेदवारी अर्जांची छाननी आज (२ जून) होणार आहे. त्यानंतर ४ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल. माघारीनंतर पुणे विधान परिषद निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद निवळल्याचे संकेत मिळत असले, तरी बंडखोर उमेदवारांच्या भूमिकेमुळे पुढील काही दिवस पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.