पुणे अपघात प्रकरणात सुप्रिया सुळे यांचे ट्वीट (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ एका मद्यधुंद चालकाने चहा पित असणाऱ्या १२ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १२ विद्यार्थ्यांमध्ये काही जण एमपीएससीचा अभ्यास करणारे देखील विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांचा आज पेपर होता. मात्र ते परीक्षेला मुकले आहेत. याबाबत आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
१२ विद्यार्थ्यांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी विद्यार्थ्यांची आज एमपीएससीची परीक्षा असल्याचे समोर येत आहे. जखमी मुलीच्या कंबरेल गंभीर दुखापत झाल्याचे समजते आहे. मद्यधुंद वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय?
पुण्यात भावे हायस्कूलजवळील अपघातात एमपीएससी करणारे तरुण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना कदाचित आजचा पेपर देता येणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे.
पुण्यात भावे हायस्कूलजवळील अपघातात एमपीएससी करणारे तरुण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना कदाचित आजचा पेपर देता येणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील…
— Supriya Sule (@supriya_sule) June 1, 2025
यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा ही विनंती.
सदाशिव पेठेत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत १२ जणांना उडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्या आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे. वैद्यकीय चाचणीनंतर वाहनचालक मद्यधुंदअवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कालच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
हा भीषण अपघात घडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. तर या मुलांची परीक्षा नंतर घेता येईल का यासंदर्भात आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते आहे. दरम्यान कोर्ट या आरोपीला कोणती शिक्षा सुनावते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आता जखमी मुलांच्या एमपीएससीच्या परीक्षेबाबत फडणवीस सरकार काय भूमिका घेणार किंवा कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश काय?
पुण्याच्या सदाशिव पेठेत भीषण अपघात घडला. यात १२ विद्यार्थी जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर या सर्वांच्या उपचाराचा खर्च शासनातफे केला जाणार आहे.