मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) मुंबईवर हल्ला (Mumbai Attack) करण्याची धमकी ई-मेलवरून (Email) देण्यात आली आहे. तालिबानचं (Taliban) नाव घेत ही धमकी देण्यात आली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. एनआयएनं मुंबई पोलिसांना याविषयीची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळं इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ईमेल आयडीवर आलेल्या मेलमध्ये मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ईमेल करणाऱ्याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे. तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानंतर मेल करण्यात आल्याचा दावा मेल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. या धमकीच्या मेलविषयी मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे. पोलीस आणि इतर तपास यंत्रणा मेल पाठवणाऱ्याचा तपास करत आहे. मुंबईसह देशातील इतर शहरांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
[read_also content=”सामान्य नागरिक सोडा पाकिस्तानातील ‘या’ भागात तर लष्करही राहतं दहशतीत! 15 वर्षांपासून ‘या’ संघटनेनं आणले नाकी नऊ https://www.navarashtra.com/world/pakistani-military-feel-helpless-in-khyber-pakhtunkhwa-as-there-is-ttp-is-so-powerful-nrps-366907.html”]
सिराजुद्दीन हक्कानी तालिबानच्या सर्वात धोकादायक गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेनंतर सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री झाला. हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख नेता आहे. तालिबाननमध्ये हक्कानीचे नेटवर्क चांगलं आहे. अमेरिकेची एजन्सी एफबीआयने हक्कानीविषयी माहिती देणाऱ्याला 10 मिलिअन डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.
जानेवारी महिन्यातही मुंबईवर हल्ला करण्याची धमकी
याआधी जानेवारी महिन्यातही मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करत शहराच्या विविध भागात बॉम्बस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. मुंबईमध्ये झालेल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाप्रमाणे हे स्फोट असतील,अशी माहिती देण्यात आली आहे. दोन महिन्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याचे आधी फोनवर सांगण्यात आले होते. त्यानंतर आता ईमेलवर धमकी देण्यात आली आहे.
पोलीस सुरक्षेत वाढ
मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असते. गेल्या सात वर्षात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी मुंबईसारख्या शहरांचं दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण केलं आहे. धमकीनंतर मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या ठिकाणीही पोलीस सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.