Sharad Pawar-Ajit Pawar
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी संध्याकाळी दिलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेले. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिले. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा झटका बसला असून, त्यांच्या गटात मोठी खळबळ माजली आहे.
अजित पवार गटातील कार्यकर्ते जल्लोषात
या निर्णयाचे राज्यभरात पडसाद उमटत असून, एकीकडे अजित पवार गटातील कार्यकर्ते आनंदात जल्लोष करीत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटातील नेते, कार्यकर्ते संतापले असून, पुन्हा लढाईसाठी सज्ज होण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दोन्ही गटांमध्ये बॅनरबाजीही सुरू असून, मुंबईत तसेच दिल्लीतही ठिकठिकाणी बॅनर युद्ध सुरू झाल्याचे पहायला मिळाले.
'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?
वाह रे पट्ठ्या…! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओही व्हायरल
एकीकडे हे सर्व सुरू असताना पवार गटाने थेट अजित पवार यांच्यावरही हल्ला चढवला. त्याचवेळी अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओही व्हायरल झाला असून, त्यातून अजित पवार यांनाच टार्गेट करण्यात आले आहे. शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली, एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरेंना सोडून भाजपामध्ये गेले, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओमध्ये अजित पवार यांनी शिंदे गटावर निशाणा साधत त्यांना खडे बोल सुनावले होते. शिवसेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटावर अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला होता.
एकनाथ शिंदेंवर चांगलीच टीका
शिंदे गटाने शिवसेनेतून फुटल्यानंतर पक्षाचे नाव आणि पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकला. निवडणूक आयोगातील लढाईही त्यांनी जिंकली. त्यानतंर अजित पवारांनी एका जाहीर सभेत त्यावरून एकनाथ शिंदेंवर चांगलीच टीका केली होती. त्यामध्ये अजित पवारांनी शिंदे गटाला शिवसेना पक्ष न चोरता नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिला होता.
व्हिडीओची जोरदार चर्चा
आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजून निकाल दिल्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. जे अजित पवार तेव्हा शिंदे यांना सल्ला देत होते, त्यावेळची त्यांची उक्ती आणि आत्ताची त्यांची कृती यामध्ये किती विरोधाभास आहे, हेच या व्हायरल व्हिडीओतून स्पष्ट होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
अजित पवार त्या व्हिडीओमध्ये काय म्हणाले ?
‘ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांनी तो पक्ष वाढवला, जो पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचच चिन्ह काढून घेतलं. हा निर्णय जरी निवडणूक आयोगाने दिला असला, तरी जनतेला तो (निर्णय) पटलाय का ? याचाही विचार झाला पाहिजे. अरे, मग तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं ?’ असा सवाल अजित पवार यांनी त्यावेळी एकनाथ शिंदेंना विचारला होता.
अजित पवार यांचा हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल झाला असून, शिंदेंना वेगळा पक्ष काढण्यास सांगणाऱ्या अजितदादांनी आता काय वेगळं केलं असा सवाल विचारला जात आहे. त्यांची तेव्हाची उक्ती आणि आता त्यांनी केलेली कृती, निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने दिलेल्या निर्णयानंतर अजित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया यात किती विरोधाभास आहे, हेच दिसत असल्याचंही बोललं जात आहे.
घरटं चोरून नेणाऱ्यांनो, उमेद कशी चोराल?; राष्ट्रवादीने काळजालाच हात घातला
कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटात एकच खळबळ उडाली असून त्या गटाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अदृश्य शक्तीने हा निकाल दिल्याचा आरोप केला जात आहे. पवार गटाने थेट अजित पवार यांच्यावरही हल्ला चढवला आहे. घरटं चोरून नेणाऱ्यांनो, उमेद कशी चोराल? असा सवाल शरद पवार गटाने केला आहे. एका कवितेच्या माध्यमातून शरद पवार गटाने हा सवाल केला. शरद पवार गटाने राष्ट्रवादीच्या ट्विर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला. त्यात एका तरुणाची कविता आहे. घरटं चोरून नेणाऱ्यांनो, उमेद कशी चोराल? असा सवाल या कवितेतून करण्यात आला आहे. हीच कविता शरद पवार गटाने ट्विट करून अजितदादा गटावर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’
तर जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला. ‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’ असं लिहीत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनीही अजित पवार यांना सुनावलं. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. त्यांनी भाजपमध्ये शिरकाव केल्याबद्दलही आम्हाला काही म्हणायचं नाही. पण त्यांनी पक्षांवर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावेत, हा वादाचा मुद्दा आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल ना, तर तुम्ही स्वत:चा पक्ष स्थापन करा, असं आव्हान राऊत यांनी दिलं. एकंदरच निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, येत्या काळात अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांमध्ये तुंबळ वाक् युद्ध पहायला मिळण्याची शक्यता आहे.