
सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास..., गटसचिव संघटनेचा इशारा
रहिमतपूर : सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथील विकास सेवा सोसायटीचे सचिव दयानंद खाडगे यांच्यावर गोळेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा सातारा जिल्हा गटसचिव संघटनेने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील गटसचिवांचे कामकाज बंद करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
ग्रामीण भागात शेतकरी हिताचे शासकीय व सहकारी संस्थांचे काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला होणे म्हणजे प्रशासनालाच दिलेले खुले आव्हान असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. या घटनेमुळे सचिव व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच सचिव व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ तळेकर, प्रशासन अधिकारी मकरंद भोसले, प्रतिनिधी कल्याण भोसले, विकास भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेने स्पष्ट इशारा देताना म्हटले आहे की, विकास सेवा सोसायटीच्या सचिवावर झालेल्या हल्ल्याची दखल प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तात्काळ कारवाई करावी. अन्यथा जिल्हाभरातील सर्व गटसचिव एकत्र येत कामकाज बंद करून तीव्र आंदोलन उभारतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
हे सुद्धा वाचा : विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात
गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का?
पुणे शहरापासून अत्यंत जवळचा तालुका म्हणून पुरंदरची ओळख आहे. सासवड शहर पुण्याचे उपनगर म्हणून बघितले जात आहे. मात्र, सध्या तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना संघटीतपणे मारहाण केली जात आहे. दुचाकीस्वार सायलेन्सरच्या पुंगळ्याचे मोठाले आवाज करून मोकाट फिरत आहेत. चोरीच्या मोठमोठ्या घटनांचा तपास केवळ कागदावर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी, केबल चोरून नेल्या जात आहेत. एकूणच गुन्हेगार मोकाट सुटल्याचे दिसत असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.