राज्यातील तब्बल 'इतक्या' शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच; वेतनश्रेणी बदलाचा मार्ग मोकळा (File Photo : Teachers)
मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा सुरू असतानाच शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेले वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण हजारो शिक्षकांनी पूर्ण करूनही त्यांना प्रमाणपत्रच मिळाले नव्हते. शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवता येत नव्हता. त्यामुळे मोठे नुकसान होत होते. मात्र, आता एससीईआरटीने पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याने शिक्षकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
राज्यातील सरकारी वेतनावर असलेल्या शिक्षकांच्या सेवेला 12 वर्षे पूर्ण झाली की, त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. तसेच 24 वर्षांनंतर हे शिक्षक निवडश्रेणीसाठी पात्र होतात. त्यासाठी या शिक्षकांना प्रशिक्षण घ्यावे लागते. या प्रशिक्षणादरम्यान आणि नंतरही त्यांच्या चाचण्या होतात. या चाचण्या उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते आणि वेतनश्रेणीत बदल होतो. यंदा राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयांमधील 40 हजार 81 शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 39 हजार 841 शिक्षक प्रशिक्षणासाठी पात्र ठरले होते.
या पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण विविध टप्प्यांमध्ये आणि विविध तुकड्यांमध्ये झाले. या प्रशिक्षणादरम्यान ५ हजार ५२७ शिक्षक अनुत्तीर्ण होते, तर ३४ हजार ३१४ शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यापैकी ३३ हजार ५७२ शिक्षक प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले. तर अद्याप ५६३ शिक्षकांची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
दहावी-बारावीची परीक्षा सुरू असतानाच शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेले वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण हजारो शिक्षकांनी पूर्ण करूनही त्यांना प्रमाणपत्रच मिळाले नव्हते. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी घाई करणाऱ्या शिक्षण विभागाने प्रमाणपत्रे देण्यात मात्र दिरंगाई केल्याने नाराज झालेल्या तब्बल ३४ हजार शिक्षकांना आता पुढील आठवड्याभरात ही प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
पुढील आठवड्यात मिळणार प्रमाणपत्रे
या शिक्षकांना उत्तीर्ण होऊनही अद्यापही प्रमाणपत्र न मिळाल्याने शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवू शकले नाहीत. त्यामुळे शिक्षकांचे मोठे नुकसान झाले. मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभागाचे अध्यक्षांनी हे प्रकरण एससीईआरटीच्या संचालकांच्या निदर्शनास आणून देत शिक्षकांना तातडीने प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी विनंती केली.