
उजनी धरण 100 % भरले
कुर्डुवाडी / हर्षल बागल : सोलापूर जिल्ह्याची भाग्यविधात्री मानले जाणारे उजनी धरण काही वेळापूर्वीच 100 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक कायम असून, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भीमा नदीत विसर्ग सुरू आहे.
सध्या उजनी धरणाच्या सांडव्यावरून 30000 क्यूसेक आणि जलविद्युत केंद्रातून 1600 क्यूसेक असा एकूण 31600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात करण्यात येत आहे. दरम्यान, दौंड येथून तब्बल 65000 क्यूसेक वेगाने पाण्याची आवक धरणात सुरू असल्याने पुढील काही तासांत विसर्गात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रात्री साडेदहा वाजता 40 हजार क्यूसेक विसर्ग
उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 10:30 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग वाढवून 40,000 क्यूसेक करण्यात येणार आहे. पाण्याच्या आवकेनुसार, या विसर्गात आणखी वाढ किंवा आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
पूरस्थिती लक्षात घेता भीमा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, जनावरे, शेती साहित्य व इतर वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.
अत्यंत दक्षता बाळगणे आवश्यक
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आनंदाचे वातावरण असले, तरी वाढता विसर्ग लक्षात घेता नदीकाठच्या सर्व नागरिकांनी अत्यंत दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस
दुसरीकडे, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. २७) दुपारच्या सुमारास पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने दमदार पुनरागमन केले. अवघ्या दोन-तीन तासांच्या जोरदार सरींमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले, तर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. काही सखल भागांत पाणी साचल्याने आणि काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.