मुसळधार पावसाची शक्यता
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात उत्तर प्रदेशात सोमवारी मान्सून पुन्हा सक्रिय झाला. तराई प्रदेश आणि बुंदेलखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामुळे कमाल तापमान खाली आले आणि दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला.
इटावामध्ये सर्वाधिक ४२ मिमी पावसाची नोंद झाली. सिद्धार्थनगरमध्ये २८.६ मिमी आणि हमीरपूरमध्ये २८ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने, सोनभद्र, सहारनपूर आणि मुझफ्फरनगरसह सात जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर ६१ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचाही अंदाज आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी सांगितले की, मान्सूनचा पट्टा पुन्हा उत्तरेकडे सरकल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे, मंगळवारपासून ३० जुलैपर्यंत तराई प्रदेशातील आणि दक्षिण उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोनभद्र, सहारनपूर, मुझफ्फरनगर, बिजनौर, मोरादाबाद, रामपूर, बरेली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे.
अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी
बांदा, चित्रकूट, कौशांबी, प्रयागराज, मिर्झापूर, चंदौली, तखीमपूर खेरी, शामली, मेरठ, अमरोहा, पिलीभीत, शाहजहानपूर, संभल, बदाऊन, हमीरपूर, महोबा, झाशी आणि ललितपूर.
गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
गुजरातच्या बनासकांठा, मेहसाणा, मोरबी, पाटण, साबरकांठा आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी ६० किमी वेगापर्यंतचे सोसाट्याचे वारे, मुसळधार पाऊस (ताशी १५ मिमी पेक्षा जास्त) आणि विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
मध्य प्रदेशातील अनुपपूर, रेवा, सिधी आणि सिंगरौली जिल्ह्यांव्यतिरिक्त, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग, श्रीनगर, जम्मू, बारामुल्ला, पुलवामा, उधमपूर, रियासी आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्येही सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






