सौजन्य - नवराष्ट्र टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांसुरु होत्या. अखेर मनसेने अधिकृत निर्णय घेत, खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांचीही मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी केल्यांनतर खेडेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
वैभव खेडेकर म्हणाले की, सोशल मीडियावर माझ्यासह जिल्हाध्यक्ष आणि इतर दोघांना बडतर्फ केल्याचे पत्र वाचून अतिशय दुःख वाटले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे. अनेक आंदोलने, जेल किंवा प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग राहिला आहे. कोकणात पक्षाची बीजे मी रुजवली आहेत. खेड नगर परिषदेत माझ्या नेतृत्वात पंधरा वर्षे मनसेकडे सत्ता होती. मी पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष झालो. पक्ष म्हणून कोकणात आघात झाले तेव्हा मी लोकांसोबत राहिलो. कोरोनामध्येही मी लोकांच्या सोबत होतो. पक्ष रुजावा ही माझी भूमिका होती.
मी भाजपच्या काही लोकांना भेटलो. म्हणून मी पक्षांतर करत असल्याच्या संशयावरून माझ्यावर कारवाई करण्यात आली. पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्याला तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो. विकास होणे महत्वाचे असल्याने सत्ताधाऱ्यांना भेटायचो. त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाली. मात्र, माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. याबद्दल मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, मला अद्याप भेट मिळालेली नाही, असे ही वैभव खेडेकर म्हणाले.
संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मी भेटीचे अनेक प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. हे माझं दुर्दैव आहे. हे पत्र स्वतः साहेबांनी काढलं असतं तर तो त्यांचा आदेश आल्याचा आनंद बाळगला असता. मी पक्षाची शिस्त बिघडेल, असे काम कधीच केले नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो म्हणून माझ्यावर अनेक कारवाया झाल्या. पक्षासाठी केलेली माझी धडपड आज तोकडी पडली, असे म्हणत वैभव खेडेकर पत्रकार परिषदेत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
वैभव खेडेकर पुढे म्हणाले की, राज ठाकरे साहेब आपण फार घाई केली. तुम्ही कालही मनात होता, आजही आहात आणि उद्याही राहाल. तीस वर्ष पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो. आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक मिळाला आहे. आजचं पत्र पाहून धक्का बसला की असं पत्र मला कधीही अपेक्षित नव्हतं. हातात घेतलेलं शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही. आता पुढील निर्णय घ्यावा लागेल. मी अजून निर्णय घेतलेला नाही, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वैभव खेडेकर कोण आहेत?
वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी 2014 मध्ये वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते राज ठाकरेंबरोबर होते. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. कोकणातील तरुण वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची क्रेझ आहे. खेड आणि दापोली परिसरा वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. वैभव खेडेकर हे त्यांच्या आक्रमक नेतृत्वशैलीसाठी ओळखले जातात.