वनताराच्या टीमने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट (फोटो- ट्विटर)
मुंबई: कोल्हापूरच्या नांदणी माठातील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेल्यानंतर कोल्हापूरचे नागरिक आक्रमक झाले आहेत. आम्हाला आमची माधुरी परत द्या अशी मागणी केली जात आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक बैठक देखील घेतली. तर आज वनताराच्या टीमने देखील मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
महाराष्ट्र शासन न्यायालयात माधुरी हत्तीणीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. दरम्यान आज वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे . महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असे वनताराने स्पष्ट केले आहे. याबाबत महाराष्ट्र सरकाच्या पुनर्विचार याचिकेत वनतारा देखील सहभागी होणार असल्याचे समजते आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट काय?
वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.
वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली.
महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
या… pic.twitter.com/GOSc9ovVVM— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 6, 2025
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हत्तीणीला तिकडे नेण्यात आले आहे. मात्र यामुळे कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. आम्हाला आमची माधुरी परत द्या अशी ते मागणी करत आहे. कोल्हापूरचे सर्वपक्षीय राजकारणी देखील यासाठी एकत्रित आले आहेत. हजारो नागरिकांनी अंबानी यांच्या जिओवर बॅन घालण्यास सुरुवात केली आहे. हजारोंच्या संख्येने जिओचे सिमकार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट करण्यात आले आहे. तसेच नांदणी गावातील जिओचा तोवर देखील बंद करावा अशी मागणी पत्राद्वारे ग्रामपंचायतीला करण्यात आल्याचे समजते आहे.
माधुरीला रवाना करताना नांदणी गावकऱ्यांनी भावनिक निरोप दिला होता. तिला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. गावकऱ्यांनी माधुरी हत्तीणीला वनतारा अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. पण यानंतर कोल्हापुरसह राज्यभरात वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातून माधुरी हत्तीणीला परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हत्तीणी माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम उभारण्यात आली आहे.