
फोटो सौजन्य - Social Media
Washim News : खामगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील विविध भागांतून दररोज सुमारे ३० टन कचऱ्याचे संकलन करण्यात येत असून यासाठी ४० घंटागाड्या कार्यरत आहेत. नियमित कचरा संकलनामुळे शहरातील स्वच्छतेची स्थिती सुधारत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांकडूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य केले जात आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळी नियोजनबद्ध पद्धतीने कचरा संकलन केले जाते. शहरातील सर्व प्रभागांमध्ये घंटागाड्यांच्या माध्यमातून घराघरांतून कचरा गोळा केला जातो. याशिवाय मुख्य बाजारपेठ परिसरात दिवसभरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असल्याने तेथील स्वच्छता राखण्यासाठी तीन स्वतंत्र घंटागाड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेत कचरा साचण्याचे प्रमाण कमी झाले असून परिसर अधिक स्वच्छ दिसत आहे.
मात्र शहरातील कचरा संकलन व्यवस्था सुरळीत सुरू असतानाच डम्पिंग यार्ड परिसरात लागणाऱ्या आगींच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कचऱ्यातील ज्वलनशील पदार्थ तसेच मिथेन वायूच्या निर्मितीमुळे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगींमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरतात. त्यामुळे जवळच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाकडून आग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डम्पिंग यार्डची नियमित देखरेख, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि आग लागल्यास तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तरीही भविष्यात अशा घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डम्पिंग यार्डचे आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
शहरातील नागरिकांनीही नगर परिषदेच्या स्वच्छता मोहिमेचे स्वागत केले आहे. नागरिक मनिषा गमे यांनी सांगितले की, घंटागाडी दररोज वेळेवर येत असल्याने घरातील कचरा व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे. परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत असून नगर परिषदेची ही सेवा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तर नागरिक प्रिया महाकाळे यांनी सांगितले की, पूर्वी काही भागांत कचरा साचलेला दिसत होता. मात्र आता नियमित कचरा संकलन होत असल्याने परिसर अधिक स्वच्छ दिसत आहे. नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
याबाबत माहिती देताना खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी सांगितले की, शहरातील सर्व प्रभागांमध्ये ४० घंटागाड्यांच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. दररोज ३० टन कचऱ्याचे संकलन केले जाते. बाजारपेठ परिसरासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ शहर घडविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे यामुळे शहर अधिक स्वच्छ आणि निरोगी ठेवणे शक्य होणार आहे.