'ज्यावेळी महिलांची नग्न धिंड काढली जात होती तेव्हा ...; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून राऊतांचा थेट प्रश्न
राज्यातील सर्व प्रश्न, पक्ष-सरकार आणि कॅबिनेटमधीलही प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. एक दिवस याविषयावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर होईल, मंत्रिमंडळात एक दिवस गँगवॉर होईल. मी वारंवार हे सांगत आहे. हे बोलल्यानंतर मला माओवादी ठरविण्याचा प्रयत्न झाला.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही प्रमुख मागण्या मान्य करत नवा जीरआर काढण्यास मान्यता दिली. त्यानुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पण त्यानंतरही मंत्री छगन भुजबळांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करत जीआर रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी सरकारधील नेते एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसत आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ” तुमच्याकडे पत्रकार परिषदेसाठी जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवनात, पत्रकार परिषदेसाठी जागा देऊ, पण यावर पत्रकार परिषद घ्या. पत्रकारांच्या चहापाण्याची व्यवस्थाही आम्हीच करू. पण जनतेच्या मनात मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात जो गोंधळ झाला आहे. त्यावर बसा चर्चा करा. वाटल्यास त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनाही एकत्र बसवा, तरच समाजात शांतता नांदेल, तसेच, आज प्रत्येक समाज अस्वस्थ आहे. गोंधळात आहे, त्याला काय चाललयं हे कळत नाहीये, पण फडणवीस यांच्यासारखा सक्षम मुख्यमंत्री असताना त्यांनी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे पत्रकार परिषदेला घाबरू नये. त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी. असा सल्लाही त्यांनी यावेली दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबरपासून मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. “मोदींच्या दौऱ्याकडे कुणाचे लक्ष नाही. मणिपूरमध्येच त्यांच्या दौऱ्याला विरोध होत आहे. काही गोष्टींवरील अराजकतेकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे उपक्रम राबवले जातात. भारत–पाक सामन्यावरचे लक्ष हटवण्याचाही हा प्रयत्न आहे,” असा आरोप राऊत यांनी केला. “जेव्हा मणिपूरमध्ये नग्न धिंड काढली जात होती, तेव्हा मोदी कुठे होते? तेव्हा त्यांनी तोंड उघडले नाही. आता दौऱ्याचा दिखावा कशाला? हे सर्व ढोंग आहे.” अशी टिकाही त्यांनी यावेळी केली






