मुंबई : राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, तर अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. दरम्यान, काल रात्री (सोमवारी) उशिरा मंत्रीमंडळ विस्तार व खातीवाटप याबाबत शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात तब्बल दिड तास बैठक चालली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्रीमंडळ विस्तार तसेच मंत्रीपद कोणाला मिळणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मलबार हिलवरील बंगल्यांत कोणाची वर्णी
राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेशिवाय अधिक काळ राहू शकत नाही, असं बोललं जात. त्यामुळं त्यांचे मंत्री सर्वाधिक काळ सत्तेमध्ये राहिलेत. तसेच ते समुद्रालगतच्या मलबार हिलमधील बंगल्यात राहिले आहेत. १७ जुलै रोजी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून तत्पूर्वी समुद्रकिनाऱ्यालगत मलबार हिलमधील आपले आवडते बंगले मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मलबार हिलवरील प्रतिष्ठेच्या बंगल्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या मंत्र्यांना फटक बसण्याची शक्यता…
दरम्यान, जर मलबार हिलवरील बंगले हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे गेले तर त्याचा फटका भाजपच्या मंत्र्यांना बसू शकतो. लोढा, गावित, अतुल सावेंना बंगले सोडावे लागतील, अशीही चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भुजबळांचे आवडते व समुद्राला लागून असलेले सर्वात महागडे म्हणून ओळखले जाणारे ‘रामटेक’ हे निवासस्थान या वेळी मात्र मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यात शिक्षणमंत्री दीपक केसरकर राहत आहेत.
याच आठवड्यात मंत्रीमंडळ विस्तार
राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. यानंतर ९ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. पण यांना कोणती खाती दयाची याबाबत अजून नक्की झाले नसल्यानं कालच्या बैठकीत यावर खलबतं झालं. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसेच मंत्रीमंडळ विस्तार व खातीवाटप याबाबत शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात चर्चा होत असून, राजकीय घडामोडींना वेग आला असून, याच आठवड्यात किंवा पावसाळी अधिवेशनाच्या आधी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.