सौजन्य - नवराष्ट्र टीम
सर्कस म्हणजे केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून, एक कुटुंब असल्यासारखे कलाकार एकमेकांसाठी उभे राहतात. सर्कसमधील कलाकारांच्या गावाहून ये-जा, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील सर्कसच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असते, अशी माहिती सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी नवराष्ट्राशी बोलताना दिली.
तसेच भारतात सुरुवात झालेल्या ह्या खेळाला जेवढी विदेशात मागणी आहे तेवढी भारतात नाही ही खंत आहे. महाराष्ट्रात सर्कसला प्रोत्साहन व प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. सर्कस ला अजूनही कसलाही अधिकृत दर्जा मिळालेला नसल्याने ह्या कलेसमोरील अडचणी वाढत आहेत. खेळाचा प्रकार जिवंत राहावा म्हणून रॅम्बोसारखे काही प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
कोरोना महामारीमध्ये सर्कस बंद होण्याची वेळ आलेली असताना त्या काळात काही प्रमाणात उत्पन्न मिळावे ह्यासाठी सर्कसने ऑनलाइन कार्यक्रम घेण्यास सुरवात केली त्यातही त्यांच्या उत्पनाच्या दुप्पट कर त्यांना भरावा लागला. त्यामुळे ह्या कलाकारांचे खूप हाल झाले आहेत. सध्या सर्कसचे अस्तित्व टिकवण्यासाठी कलाकार झटत असून, प्रेक्षकांनी पुन्हा सर्कसकडे वळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मनोरंजनाची अनेक माध्यमे आल्याने सध्याच्या काळात सर्कस मागे पडत आहे. कलाकारांना त्यांच्या कलेचा आधार असतो त्यातूनच त्यांचे उत्पन्न तयार होते. कला मागे पडत चाललीय, ही काळजीची बाब आहे. फक्त सरकारने नव्हे तर नागरिकांनी सुद्धा ह्याकडे लक्ष दिले पाहिजे. असे कलाकारांनी नवराष्ट्राशी बोलताना सांगितले.
रॅम्बो सर्कस हे सर्व कलाकारांसाठी एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला जपण्यासाठी प्रत्येक कलाकार जोमाने प्रयत्न करत असतो. ह्या खेळाला चांगला दर्जा मिळावा आणि सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी सर्कस मधील कलाकार आणि सुजित दिलीप यांनी नवराष्ट्राशी बोलताना केली.
हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाची तारीख ठरली; प्रशासकांकडून होणार सादरीकरण






