'या' किरकोळ कारणावरून तमाशा कलावंतांचा विनयभंग! संगमनेर तालुक्यातील घटना; चौघांना अटक
वरुडी पठार (ता. संगमनेर) येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रोडवर दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर जमावाने हल्ला केल्याची संतापजनक घटना बुधवारी (दि. १) घडली. या भीषण प्रकारात महिला कलावंतांना मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला. कलावंतांचे सोने व रोकडही लुटली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक केली असून इतर अनोळखी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सुप्रसिद्ध विठाबाई भाऊ मांग तमाशा फडातील ४४ पुरुष कामगार व १६ महिला कलावंत १ एप्रिलला पोखरी बाळेश्वर येथील कार्यक्रम संपवून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने सारोळे पठार येथे जात होते. वरुडी पठार शिवारातील एचपी पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी ते थांबले होते. तेथे डिझेल भरुन पेट्रोल पंपाच्या बाहेर निघताना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सव्हींस रोडवर ट्रकच्या समोर चार ते पाच जण मोटारसायकलस्वार आले.
Pulsar चा दर्जा अजूनच वाढणार! ‘या’ बाईकचा 350cc व्हर्जन लवकरच होणार लाँच
त्यांनी ट्रक ड्रायव्हर प्रकाश विठ्ठल औटी (रा. राजुरी ता. जुन्नर) याला कट मारण्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर ड्रायव्हरला गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली. यादरम्यान तमाशातील कलावंत त्यांस सोडवण्यासाठी गेले असता त्यांनी ड्रायव्हर विकास सुखदेव जठार यांना देखील हाताने व काठीने मारहाण केली. तसेच लक्झरी बसच्या (क्र. एमएच ०४ एफके ००९६) दरवाज्याच्या काचेवर दगड मारुन काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शखाली घारगाव पोलिस करत आहेत.
बसमधील कलावंत अक्षरा शामिल शिंदे, आरुषी सुमित काळे (रा. सांगवी ता. फलटण), संध्या राम चौघुले (रा. संभाजीनगर), शामिल अतुल शिंदे (रा. सांगवी ता. फलटण), गणेश शिवाजी गायकवाड (रा. सांगोला जि. सोलापुर), अनुज विशाल हुलसार (रा. नारायणगाव ता. जुन्नर), राम बशीरुध्दीन चौगुले (रा. संभाजीनगर), अजित वाळुंज (रा. आळेफाटा ता. जुन्नर) यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली.
या हल्लेखोरांनी त्यांचे इतर साथीदारांना बोलावून घेतले. काही महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. कैलास सावंत यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन व जवळ असलेले सव्वा दोन लाख रुपये काढून घेतले. धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाणही केली.
याप्रकरणी कैलास मारुती सावंत यांच्या फिर्यादीवरून सुमित शांताराम गुंजाळ, संकेत शांताराम बांगर, सोमेश सुखदेव बोंबले, दत्तात्रय रावसाहेब पडवळ (सर्व रा. कर्जुले पठार ता. संगमनेर) व इतर १० अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील वरील चार जणांना अटक करण्यात आली आहे.






