
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्म सिटी) यांच्या वतीने तयार होणाऱ्या ‘खंजिरीचे बोल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबईत उत्साहात पार पडला. हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पहिला फीचर फिल्म आहे.
या चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. मुहूर्तानंतर चित्रपटाच्या शूटिंगलाही अधिकृत सुरुवात झाली असून, लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर येथे सुरू होणार आहे.
एकेकाळी कीर्तन हे समाज प्रबोधन, ग्रामविकास, राष्ट्रभक्ती आणि भक्तीचा संदेश देणारे महत्त्वाचे माध्यम होते. संतांच्या कीर्तनातून लोकांना चांगली दिशा मिळत असे. मात्र आजच्या आधुनिक काळात ही परंपरा हळूहळू कमी होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, कार्यपद्धती आणि समाजासाठी केलेले योगदान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा चित्रपट तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि समाजप्रबोधनाचा संदेश महाराष्ट्रासह देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन करत असून कथा-लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण हिमांशु दुबे यांचे असून संगीत कौशल इनामदार यांनी दिले आहे. तसेच चित्रपटाचे कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्म सिटी) यांच्या निर्मितीत, कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या सहकार्याने हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली आहे. हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. त्यांच्या समाजप्रबोधनाचे कार्य, कीर्तन परंपरा आणि ग्रामगीतामधून दिलेले विचार या चित्रपटातून प्रभावीपणे दाखवले जाणार आहेत.
लक्ष्मी आली घरा! Randeep Hooda आणि Lin Laishramने दिली गुडन्यूज, घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन
यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून मानवी मूल्ये, राष्ट्रभक्ती आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर आधारित चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘खंजिरीचे बोल’ हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असून त्यांच्या ग्रामसेवा, परोपकार आणि भक्तीच्या विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोठे माध्यम ठरेल. दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे दिग्दर्शन आणि अभिनेता प्रसाद ओक यांचा प्रभावी अभिनय यामुळे हा विषय अधिक ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.