(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन आणि भावस्पर्शी कलाकृतींसाठी ओळखला जाणारा आगामी चित्रपट ‘माया’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘मन गाईना सुरात’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, ते संगीतप्रेमींच्या मनात घर करू लागले आहे. आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याचा सकारात्मक संदेश देणारे हे गाणे ऐकताना एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता अनुभवायला मिळते आहे.
‘मन गाईना सुरात’ या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शब्द, संगीत आणि दृश्यांची अप्रतिम सांगड. कवी वैभव जोशी यांनी लिहिलेले अर्थपूर्ण आणि भावस्पर्शी शब्द मनाच्या कोमल भावना जागृत करतात. तर, या गाण्याला अंजली मराठे हिच्या सुरेल आवाजामुळे या शब्दांना एक खास उंची लाभली आहे. तिच्या आवाजातील कोमलता आणि भावनांची खोली गाण्याच्या आशयाला अधिक प्रभावी बनवते. पार्थ उमराणी यांनी दिलेले संगीत साधे, शांत आणि अंतर्मुख करणारे आहे. धून ऐकताच मनात एक प्रकारची प्रसन्नता आणि आशावाद निर्माण होतो.
गाण्याचे दृश्यांकनही तितकेच प्रभावी आहे. प्रकाश, रंगसंगती आणि हसऱ्या क्षणांची सुंदर मांडणी करत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. आयुष्यातील संभ्रम, मनाचे विविध विभ्रम आणि नात्यांतील सूक्ष्म भावना या गाण्यातून सुरेलपणे व्यक्त होतात. त्यामुळे हे गाणे केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न राहता अनुभवण्यासारखे ठरते.
दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या मते, “‘मन गाईना सुरात’ हे आमच्या चित्रपटातील अतिशय महत्त्वाचे गाणे आहे. कथानकातील काही अव्यक्त भावना आणि मनातील द्वंद्व या गाण्यातून सुंदरपणे मांडले गेले आहे.” त्यांच्या दिग्दर्शनातून भावनांचा सूक्ष्म वेध घेतला गेला असून, गाणे आणि कथा यांची एकसंधता स्पष्ट जाणवते. निर्माते नितीन वैद्य यांनीही या गाण्याबद्दल विशेष भावना व्यक्त करत म्हणाले की, “‘माया’मधील हे गाणे प्रेक्षकांना सकारात्मक ऊर्जा देईल. कथानकाच्या निर्णायक टप्प्यावर येणारे हे गाणे चित्रपटाच्या भावविश्वाला आकार देते. साधे पण हृदयाला भिडणारे संगीत प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ राहील.”
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन यांच्या निर्मितीत साकारलेला ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, मुक्ता बर्वे, गिरीश ओक, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांसारखे दमदार कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या व्यक्तींच्या भावविश्वाचा सूक्ष्म आणि वास्तववादी वेध घेणारी कथा ‘माया’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.






