
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय भक्ती मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ येत्या महारविवारी प्रेक्षकांसाठी एक अत्यंत भावनिक आणि रोमांचक अनुभव घेऊन येत आहे. मालिकेच्या या विशेष भागात, अन्याय, भीती आणि संकटांच्या गर्तेत सापडलेल्या वीणासाठी स्वामी समर्थ स्वतः पुढे येणार आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी स्वामी कितीही अजस्त्र रूप धारण करू शकतात, याचा प्रत्यय या भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.
कलियुगात, अन्याय, अहंकार आणि कटकारस्थानांच्या छायेत अडकलेल्या एका कुटुंबाच्या संघर्षाचा अंतिम टप्पा या भागात उलगडणार आहे. काका रणजीतच्या कारस्थानांमुळे वीणा जीवघेण्या संकटात सापडते, एका क्षणी तिचा शेवट जवळ आला आहे, असं वाटत असतानाच स्वामी तिच्या पाठीशी उभे राहतात. उलगडतो असा एक टप्पा जो विस्मयचकित करणारा आहे. भक्तांच्या स्वप्नांच्या आड येणाऱ्यांना रोखण्यासाठी, स्वामींचं रूप अधिकच विराट होत जाणार आहे,वीणाच्या रक्षणासाठी स्वामी घेणार नृसिंह अवतार. मात्र नेमकं काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना महारविवारची वाट पाहावी लागणार आहे.
भक्ती, श्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शक्ती यांचा संगम असलेला हा विशेष भाग प्रेक्षकांना भावनिक आणि दृश्यात्मक अनुभव देणार आहे. वीणाचं पुढे काय होणार? रणजीतच्या मनसुब्यांना आळा बसेल का? आणि स्वामींचं हे विराट रूप नेमकं काय संदेश देणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उलगडतील येत्या महारविवारी.
“जय जय स्वामी समर्थ” ही मालिका श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. महाराजांच्या चमत्कारी आणि आध्यात्मिक कार्य या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. भक्तांच्या अडचणी सोडवणे, समाजातील अज्ञान दूर करणे आणि सर्वांना अध्यात्मिक मार्ग दाखवणे, हेच या मालिकेचं मुख्य सूत्र आहे.