(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सध्या एका नव्या आणि आव्हानात्मक वळणावर आहे. या वळणात आदिशक्तीची रचना, तिच्या दैवी अवतारातील मानवी मर्यादा आणि भावना यांचा गुंता दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे मिळालेले आव्हान अधिकच रंजक झाले आहे.मालिकेच्या येत्या भागात दैवी शक्तींच्या मानवी अवतारातल्या नात्यांमधल्या भावना, त्यांच्यातला अविश्वास आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या रहस्यमय घटनांचं नाट्यमय मिश्रण पाहायला मिळणार आहे. शिवा–जगदंबाच्या नात्यात एका छोट्याशा भेटवस्तूच्या निमित्ताने निर्माण होणारं मोठं वादळ प्रेक्षकांना तणावाची जाणीव करून देणार आहे. या भेटवस्तूत दडलेला अर्थ आणि त्या भेटीमुळे निर्माण होणारी घटनांची मालिका ही संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहे. या भेटीमुळे जगदंबेचा जो मोठा गैरसमज होतो, तो शिवाचं सत्य दूर करेल का आणि हा दैवी प्रवास कसा घडेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
जगदंबेसाठी तिचे आई–वडील योग्य वर शोधात असताना गंगाईला महिपती तिच्याशी लग्न करण्यासाठी योग्य वर वाटतो. महिपतीमुळे जगदंबेच्या मनात शिवाबद्दल गैरसमज निर्माण होतो आहे. अजूनही जगदंबा शिवाच्या खऱ्या रूपापासून अनभिज्ञ आहे. जगदंबेसाठी शिवाने पाठवलेली भेटवस्तू असूयेमुळे महिपती बदलून टाकतो. या बदललेल्या भेटवस्तूने जगदंबेच्या मनात शिवाविषयी भीती आणि राग निर्माण होतो. आई गंगाई तिचा गैरसमज अजून घट्ट करते, ज्यामुळे जगदंबा थेट शिवासमोर जाब विचारण्यासाठी उभी राहते. शिवा मात्र शांतपणे सांगतो की त्यानं दिलेली खरी भेट पूर्णपणे वेगळी आहे आणि ती तिला मिळाली आहे. शिवाच्या या म्हणण्याचा अर्थ काय आणि त्याचवेळी जगदंबेच्या घरात प्रकाशमान झालेल्या मण्याचा अर्थ काय, याची रंजक गोष्ट आगामी भागात उलगडणार आहे.






