(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठीतील नामवंत चेहऱ्यांना घेऊन तयार झालेला ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरपासून मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाला आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर सोहळा नुकताच संपन्न झाला. नामवंतांची उपस्थिती, सिनेमाच्या म्युझिक टीमने संगीत निर्मितीचे उलगडलेले सुखद अनुभव आणि वेगवेगळ्या धमाकेदार परफॉर्मन्सच्या सादरीकरणाने या सोहळ्याची रंगत चांगलीच वाढवली. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत.
‘आतली बातमी फुटली’ हा कॉमेडी क्राइम सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा एका खूनाच्या सुपारीच्या रहस्या भोवती फिरते. ही खूनाची सुपारी नेमकं कोणतं वळण घेणार? या वळणावर कोणते बंध निर्माण होणार? याची धमाल कथा आतली बातमी फुटली या चित्रपटामध्ये दिसणार आहे. नातेसंबधावर भाष्य करतानाच प्रेमाचे वेगवेगळे कंगोरे हा चित्रपट उलगडून दाखवतो. जीवनात प्रत्येकाचा एक दृष्टीकोन असतो. त्यामुळे दुसऱ्याचा दृष्टीकोन हा आपल्याला नेहमीच वेगळा वाटतो. हा दृष्टीकोन कधी पटतो तर कधी पटत नाही. यावरही या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला ‘आतली बातमी फुटली’ चित्रपट धमाल पाहायला मिळणार आहे.
आपल्या मराठी पदार्पणाबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल पी. गांधी म्हणाले की, ‘माझा जन्म मुंबईतला त्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटाचे विषय या सगळ्याबद्दल मला कायमचं आकर्षण राहिलं आहे. चित्रपटाचा आशय हे मराठी चित्रपटाचं बलस्थान राहिलं आहे. त्यामुळे मनोरंजक आणि तितकाच दर्जेदार आशय आणताना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न मी ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटातून केला आहे. हा चित्रपट सिच्युएशनल कॉमेडी असून प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे.’ असे ते म्हणाले ते म्हणाले आहेत.
सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील प्रेक्षकांना रिफ्रेश करणारं आहे. या चित्रपटाचा फ्रेश लुक आणि त्याला साजेसं संगीत प्रत्येकाला नक्कीच आवडेल. ‘सखूबाई’, ‘चंद्राची गोष्ट’, जालीम सरकार, ‘आतली बातमी फुटली’ हे रॅप अशी वेगवेगळ्या मुडची चार गाणी या सिनेमात आहेत. ही चारही गाणी सध्या सोशल माध्यमावर ट्रेंडिंग आहेत. चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेल्या चित्रपटातली गाण्यांना जावेद अली, सुनिधी चौहान, प्रेमराज सोनाली सोनावणे, एग्नेल रोमन यांचा आवाज लाभला आहे. आणि संपूर्ण संगीताची जबाबदारी एग्नेल रोमन यांनी सांभाळली आहे.
या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांनी केली आहे. तर, सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांनी केले आहे. चित्रपटाची कथा जैनेश इजरदार यांनी लिहिले आहे, तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, आणि अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.