
abdul-sattar
मुंबई : नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवे सरकार स्थापन झाले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला. या घटनेला आता दीड वर्षे उलटली आहेत. मात्र, सत्तेतून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या नाराजीची ‘धुसफूस’ अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या काळात राजकीय विजनवासात गेलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच मुंबईत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून मुंबई आणि विधिमंडळापासून दूर असलेले अब्दुल सत्तार अचानक मुंबईत प्रकटले. अजिंठा लेणी परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ७०० एकर क्षेत्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या ‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मात्र, विशेष बाब अशी की, सत्तार यांनी मंत्र्यांची भेट घेतली असली तरी त्यांनी मंत्रालयात जाणे टाळले. सत्तेतून पायउतार झाल्याची सल अद्याप कायम असल्याचेच यातून दिसून येते.
दरम्यान, २०२४ च्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर तसेच अजित पवार गटाचे दिलीप वळसे-पाटील, संजय बनसोडे, अनिल पाटील यांसारख्या वजनदार नेत्यांना स्थान मिळाले नव्हते. शपथविधीच्या दिवशीच डावलले गेल्याचे समजताच हे नेते नागपूर विमानतळावरून तडक आपल्या घराकडे रवाना झाले होते.
सावंत, केसरकरांची सभागृहात नाही उपस्थिती
गेल्या दीड वर्षात विधिमंडळाची पाच अधिवेशने झाली. मात्र, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनी सभागृहात आपली उपस्थिती दर्शवली नाही. याउलट, दिलीप वळसे-पाटील यांनी मात्र ज्येष्ठत्वाचे भान राखत प्रत्येक अधिवेशनाला न चुकता हजेरी लावली आहे.