(Photo - X)
राज्यात मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू करत आरक्षणाच्या प्रश्नावर आरपारची लढाई लढण्याची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडूनही जरांगे पाटलांच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
सरकारकडून यापूर्वी आश्वासनं देण्यात आली, मात्र त्यानंतरही मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप जरांगे पाटील करत आहेत. यावरून विरोधकांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या मुद्द्यावर राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतं, असा दावा त्यांनी केला. “प्रत्येकवेळी वेगवेगळी लोकं समोर करून जरांगे पाटील यांना शब्द दिला जातो,” असा आरोप जाधव यांनी केला. सर्व पक्षांतील नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप त्यांची भेट का घेतली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
आंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा संदर्भ देत भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. ज्या पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबाराच्या घटनेशी संबंधित आरोप झाले, त्याला बढती देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसंच शंभूराज देसाई यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीलाही बढती देण्यात आल्याचा आरोप करत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या काही व्यक्तींची जात प्रमाणपत्रं रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दिलेल्या नोंदी रद्द करण्याचा निर्णय चुकीचा होता, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावं, अशी त्यांची मागणी आहे.
तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांनी याबाबतही भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्या माध्यमातून झालेली चूक सुधारण्याची भूमिका घेतली, मग फडणवीस यांनीही तशी भूमिका का घेऊ नये, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
दरम्यान, परभणीतील एका घटनेवरूनही भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. १०८ क्रमांकावर वारंवार संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांनी सरकारला जबाबदार धरलं. या घटनेनंतर सरकारवर कठोर कारवाईची मागणी करत जाधव यांनी “सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका मांडली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत महाराष्ट्र निष्काळजी प्रशासनाच्या हातात असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, त्यांच्या आगामी भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही प्रतिक्रिया तीव्र होत असल्याने राज्यातील आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे.






