
Harshvardhan Sapkal supports Rohit Pawar Hunger strike,
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ पार पडत असून आज (शनिवार, १३ जून) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सत्त्ताधारी नेत्यांनी यावरून रोहित पवार यांना लक्ष्यही केले आहे. विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनात जाहीर पाठींबा असल्याचे पत्र दिले आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, आपणही आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईतील टिळक भवन येथे मपञकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत, म्हणून संपूर्ण कर्जमाफी करून, सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत, त्या सरकारने मान्य कराव्यात. रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी जाऊन मी सुद्धा उपोषण करणार आहे,” असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. विनाअट सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवर देखील रोहित पवारांनी भाष्य करून सरकारकडे मागण्या केल्या आहेत. रोहित पवारांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “आंदोलन केल्यानंतर कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १२०० रुपयांवरून १५८० रुपयांपर्यंत सरकारने वाढ केली आणि आता तो १६५० रुपयांपर्यंत वाढवल्याबद्दल सरकारचे आभार! पण दरात अशी टप्प्याटप्प्याने थोडी-थोडी वाढ करण्याने शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्याऐवजी एकाचवेळी किमान प्रतिक्विंटल २५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची आमची सरकारकडं मागणी आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना फायदा होईल.”
आंदोलन केल्यानंतर कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १२०० रुपयांवरून १५८० रुपयांपर्यंत सरकारने वाढ केली आणि आता तो १६५० रुपयांपर्यंत वाढवल्याबद्दल सरकारचे आभार! पण दरात अशी टप्प्याटप्प्याने थोडी-थोडी वाढ करण्याने शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्याऐवजी एकाचवेळी किमान प्रतिक्विंटल २५००… pic.twitter.com/a5gEaw4lyf — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 13, 2026
“तसंच नाफेडच्या माध्यमातून २ लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली खरी, पण गेल्या पंधरा दिवसांचा विचार केल्यास नाशिकमध्ये आतापर्यंत केवळ १०० टन इतक्याच कांद्याची खरेदी करण्यात आली. संथ गतीने चालणारी यंत्रणा, जाचक अटी यामुळं कांदा खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरु असून परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने कवडीमोल भावात कांदा विकण्याची वेळ येत आहे. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, नाफेड, एनसीसीएफ आणि वखार महामंडळ या सर्व यंत्रणांना स्पष्ट सूचना द्याव्यात आणि कांदा खरेदी करताना ज्या जाचक नियमांची फूटपट्टी लावली जाते, त्याही शिथिल करण्यात याव्यात, ही विनंती!” असे ते यावेळी म्हणाले.