बाळासाहेब थोरातांचा रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ पार पडत असून आज (शनिवार, १३ जून) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सत्त्ताधारी नेत्यांनी यावरून रोहित पवार यांना लक्ष्यही केले आहे. विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनात जाहीर पाठींबा असल्याचे पत्र दिले आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, यावरून राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे. सरकारने या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून न पाहण्याचे आवाहन करत “सरसकट कर्जमाफी शिवाय आता पर्याय नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून बाळासाहेब थोरात यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ते यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारनेही या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नाही. आज शेतकरी सर्वार्थाने अडचणीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीत नियमांच्या कचाट्यात अडकवून त्याला तुटपुंजी कर्जमाफी देणे योग्य ठरणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी दिली तरच ती खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.”
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारनेही या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नाही. आज शेतकरी सर्वार्थाने अडचणीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीत नियमांच्या कचाट्यात अडकवून त्याला तुटपुंजी… pic.twitter.com/w9837FuiVX — Balasaheb Thorat (@bb_thorat) June 13, 2026
पुढे ते म्हणाले, “रोहित पवार यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. सरकारने या विषयावर तातडीने आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. सरसकट कर्जमाफी शिवाय आता पर्याय नाही हे सरकारने लक्षात घ्यावे.” बाळासाहेब थोरातांच्या या ट्विटनंतर आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. विनाअट सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवर देखील रोहित पवारांनी भाष्य करून सरकारकडे मागण्या केल्या आहेत. रोहित पवारांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “आंदोलन केल्यानंतर कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १२०० रुपयांवरून १५८० रुपयांपर्यंत सरकारने वाढ केली आणि आता तो १६५० रुपयांपर्यंत वाढवल्याबद्दल सरकारचे आभार! पण दरात अशी टप्प्याटप्प्याने थोडी-थोडी वाढ करण्याने शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्याऐवजी एकाचवेळी किमान प्रतिक्विंटल २५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची आमची सरकारकडं मागणी आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना फायदा होईल.”
आंदोलन केल्यानंतर कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १२०० रुपयांवरून १५८० रुपयांपर्यंत सरकारने वाढ केली आणि आता तो १६५० रुपयांपर्यंत वाढवल्याबद्दल सरकारचे आभार! पण दरात अशी टप्प्याटप्प्याने थोडी-थोडी वाढ करण्याने शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्याऐवजी एकाचवेळी किमान प्रतिक्विंटल २५००… pic.twitter.com/a5gEaw4lyf — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 13, 2026
“तसंच नाफेडच्या माध्यमातून २ लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली खरी, पण गेल्या पंधरा दिवसांचा विचार केल्यास नाशिकमध्ये आतापर्यंत केवळ १०० टन इतक्याच कांद्याची खरेदी करण्यात आली. संथ गतीने चालणारी यंत्रणा, जाचक अटी यामुळं कांदा खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरु असून परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने कवडीमोल भावात कांदा विकण्याची वेळ येत आहे. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, नाफेड, एनसीसीएफ आणि वखार महामंडळ या सर्व यंत्रणांना स्पष्ट सूचना द्याव्यात आणि कांदा खरेदी करताना ज्या जाचक नियमांची फूटपट्टी लावली जाते, त्याही शिथिल करण्यात याव्यात, ही विनंती!” असे ते यावेळी म्हणाले.






