मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी आरक्षणावरून छगन भुजबळांवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या निर्णयावरून मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भुजबळांनी स्वतःचं राजकारण पाहावं, असा टोला लगावत जरांगेंनी त्यांच्या राजकीय भूमिकांवरही निशाणा साधला.
मनोज जरांगे म्हणाले की, “या वयात त्यांनी स्वतःचं राजकारण पाहावं. पुतण्याला खासदार कसं करता येतं, ते पाहावं.” ओबीसींच्या नावावर भुजबळांनी बरंच काही केल्याचा आरोपही त्यांनी केला. भुजबळांच्या राजकीय वाटचालीवर टीका करताना ते कधी महाविकास आघाडीत, कधी महायुतीत तर कधी अजित पवारांसोबत असल्याचं जरांगे म्हणाले.
छगन भुजबळांवर थेट आरोप करताना जरांगे यांनी ओबीसी महामंडळ आणि महाराष्ट्र सदनाचा उल्लेख केला. ओबीसी समाजाने आता भुजबळांना ओळखलं आहे, असा दावा त्यांनी केला. भुजबळांची राजकीय परिस्थिती आता बदलत असल्याचंही जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला केवळ 10 टक्के आरक्षण देण्यात आलं असून मराठा समाज मोठा असल्याचं सांगत जरांगे यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या आकडेवारीवरही प्रश्न उपस्थित केला. भुजबळांना गेल्या दोन दिवसांत काय झालं, असा सवाल करत त्यांनी “म्हातारपणात चांगली भूमिका घेतील असं वाटलं होतं; पण बळ गेलं तरी पीळ गेला नाही,” असा टोला लगावला.
दरम्यान, राज्यात ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे.
याआधी छगन भुजबळ यांनी जात पडताळणी समितीवर कोणताही दबाव आणू नये, अशी भूमिका मांडली होती. काही प्रमाणपत्रे समितीने नाकारली असल्याचा उल्लेख करत त्यांनी ती दुरुस्त करून देण्याबाबतही सवाल उपस्थित केला. मुंबईतील काही नगरसेवकांच्या जात पडताळणीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकार आणि मराठा आरक्षणाशी संबंधित नेत्यांना प्रश्न विचारले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना दाखल्यांमध्ये करण्यात आलेल्या कथित फेरफारांबाबतही भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर मराठा-कुणबी मंत्रालयाच्या चर्चेवरही त्यांनी आक्षेप घेतला.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका भुजबळांनी मांडली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आरक्षणांचा लाभ कसा मिळू शकतो, याबाबत सरकारने स्पष्टता आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
ओबीसी समाजाच्या विकासासाठी निधीच्या मुद्द्यावरूनही भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी आणि ओबीसी समाजाच्या समितीला तुलनेने कमी निधी का, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, मराठा आरक्षण उपसमिती स्थानिक पातळीवर निर्णय घेत असून जीआर काढत असल्याच्या मुद्द्यावरही भुजबळांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. समितीला असे निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल करत गरज पडल्यास आपण रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर जरांगे आणि भुजबळ यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.






